वीज दरवाढ विरोधात 19 ऑगस्ट रोजी कोल्हापूरात राज्यस्तरीय वीज परिषद
schedule14 Aug 25 person by visibility 157 categoryराज्य

▪️स्मार्ट मीटरसह दरवाढीविरोधात व्यापारी उद्योजक शेतकरी-घरगुती ग्राहकांचा एकजूटीचा इशारा
कोल्हापूर : शासनाने वीज ग्राहकांची दिशाभूल थांबवून केलेली वीज दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी व्यापारी, उद्योजक, शेतकरी आणि घरगुती वीज ग्राहकांचा एकजुटीचा इशारा देण्यासाठी 19 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य वीज परिषद भरवली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
वीज परिषद मंगळवारी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत गोविंदराव टेंबे रंगमंदिर, देवल क्लब, खासबाग, कोल्हापूर येथे होणार आहे. परिषदेचे आयोजन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चर, मुंबई व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या नेतृत्वाखाली होत असून महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, दि महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना, अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि इतर औद्योगिक संघटनांचा यात सहभाग असल्याचे ललित गांधी यांनी सांगितले.
वीज परिषदेत विवेक वेलणकर (पुणे), शंतनू दिक्षीत (प्रयास संस्था, पुणे), अँड. शेखर करंदीकर (मिरज), जावेद मोमीन (वीज ग्राहक संघटना, इचलकरंजी), सचिन शिरगावकर (उद्योजक, कोल्हापूर), अजय भोसटेकर (माजी अध्यक्ष, वीज ग्राहक तक्रार निवारण मंच, पुणे व नाशिक झोन), कमलाकर बुटांडे (माजी सदस्य, वीज ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूर), अमित कुलकर्णी (अध्यक्ष, दि महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, नाशिक), प्रदीप खाडे (उपाध्यक्ष, दि महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन), रत्नाकर तांबे (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, सातारा), विक्रांत पाटील (सदस्य, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, कोल्हापूर) आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
▪️दरवाढीवर संताप, स्मार्ट मीटरवर संशय :
जानेवारी 2025 मध्ये महावितरणने वीज नियामक आयोगाकडे दरवाढ प्रस्ताव सादर केला. ग्राहकांच्या ठाम विरोधानंतर 28 मार्च रोजी आयोगाने स्थगिती दिली होती. पण ३ एप्रिलला ती मागे घेतली आणि 25 जूनला हरकती न मागवता नवे दरपत्रक जाहीर केले. केव्हीएएच बिलिंग, वाढलेला स्थिर आकार, टीओडी दर, आणि क्रॉस सबसिडी रद्द या निर्णयामुळे उद्योग, व्यापार आणि ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. पानपट्टीसारख्या छोट्या व्यवसायांचे बिल 550 रुपयांवरुन 1100-1300 रुपयांवर गेले आहे. ही परिषद वीज दरवाढीविरोधातील लढ्याची सुरुवात असून, राज्यभरातील व्यापारी, उद्योजक, घरगुती व शेती ग्राहक परिषदेसाठी कोल्हापूरात मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती गांधी यांनी दिली.
कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी महावितरणकडून बसवले जाणारे स्मार्ट मीटर सदोष असल्याचा आरोप केला. काहीवेळा बसवणाऱ्या व्यक्तीकडे महावितरणची ओळखपत्रे नसतात, तसेच घरात कोणी नसताना परवानगीशिवाय मीटर बसवल्याचे प्रकार घडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर सक्ती नसल्याचे सांगूनही ही कार्यवाही सुरु असल्याने विरोध अधिक तीव्र होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेस राजू पाटील, धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, वैभव सावर्डेकर, प्रशांत शिंदे, अजित कोठारी, राहुल नष्टे, आनंद माने, कमलाकांत कुलकर्णी, स्वरूप कदम, मोहन कुशिटे, राहुल पाटील, संपत पाटील, अनिल धडाम, विक्रांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.