कोल्हापुरात इंधनवाढ व महागाईविरोधात शिवसेना (UBT) आक्रमक; कोल्हापूर-हुपरी रस्त्यावर 'रास्ता रोको' करत तीव्र निदर्शने
schedule25 May 26 person by visibility 174 categoryराजकीय
कोल्हापूर : देशात सातत्याने होणारी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरची दरवाढ तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईच्या विरोधात करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. गेल्या १० दिवसांत तब्बल चार वेळा झालेल्या दरवाढीचा निषेध करत शिवसैनिकांनी उंचगाव हायवे पुलाखाली कोल्हापूर-हुपरी रस्त्यावर जोरदार 'रास्ता रोको' आंदोलन केले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी दुचाकी वाहने आणि गॅस सिलिंडरला प्रतीकात्मक हार घालत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे परिसरातील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ ठप्प होऊन वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
आंदोलनाचे नेतृत्व करताना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी केंद्र सरकारवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला. पाच राज्यांच्या निवडणुका संपताच केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या १५ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल ७ रुपयांची भरमसाठ वाढ झाली आहे. या इंधनवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. आधीच घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, छोटे व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबे मेटाकुटीला आली आहेत. त्यातच ही नवीन इंधनवाढ सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारी ठरत आहे. अशा शब्दांत त्यांनी तीव्र निषेध नोंदवला. तसेच, जर केंद्र सरकारला महागाईवर नियंत्रण मिळवता येत नसेल, तर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत येणाऱ्या केंद्रीय निवडणुकीत सुशिक्षित मतदार व सामान्य जनता या सरकारला घरी बसवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही यादव यांनी दिला.
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट आणि शहरप्रमुख विशाल देवकुळे यांनीही भाजप सरकारवर सडकून टीका केली. केंद्र सरकारने या वाढलेल्या किमती तात्काळ मागे घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा यापुढे शिवसैनिक अधिक आक्रमक होऊन रस्त्यावर उतरतील आणि यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वातावरण पूर्णपणे दणाणून गेले होते.
या तीव्र निदर्शन व रास्ता रोको आंदोलनात करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, शहरप्रमुख विशाल देवकुळे यांच्यासह कामगार सेनेचे राजू सांगावकर, उपतालुकाप्रमुख राहुल गिरूले, फेरीवाले संघटनेचे बाळासाहेब नलवडे, दीपक गौड, युवा सेनेचे योगेश लोहार, सचिन नागटिळक, महादेव खोचगे आणि शंकर खोत उपस्थित होते. तसेच शिवाजी लोहार, शांताराम पाटील, मनोज कुरळे, दत्ता फराकटे, जितू कुबडे, आनंदा मेंगाने, कृष्णात तुरुके, दीपक धिंग, सुनील पारपाणी, दीपक अंकल, आनंदा नाईक, शरद माळी, कैलास जाधव, अक्षय ठमके, नमेश चव्हाण, वसंत पोवार, सागर यादव, बाबुराव पाटील, गणेश सूर्यवंशी, धनंजय पाटील, संदीप वडर, प्रवीण गोरे, अनिल जाधव, शंकर कांबळे, राजू व्हनाल, किशोर कामरा, जितू चावला, संदीप तिकोडे, सूरज पाटील, किरण सिंग, सिकंदर मुजावर, राजू राठोड, गणेश पाटील, मोहन राजपूत, शरद चव्हाण यांसह असंख्य शिवसैनिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.