लोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृती
schedule11 Jul 26 person by visibility 172 categoryशैक्षणिक
कोल्हापूर: जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून भाई माधवरावजी बागल प्रशाला आणि राजर्षी शाहू विद्यामंदिर, कसबा बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी "छोटे कुटुंब – सुखी कुटुंब" हा महत्त्वाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला.
केंद्रप्रमुख डॉ. अजितकुमार पाटील आणि मुख्याध्यापिका पद्मिनी माने यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे सादरीकरण केले. भगतसिंग वसाहत आणि आठवडी बाजार परिसरात विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम, कुटुंब नियोजनाचे महत्त्व आणि सामाजिक जागरूकतेचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या या प्रभावी सादरीकरणाला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कौतुक केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाई माधवरावजी बागल प्रशालाचे गजानन सावंत, नामदेव पाटील, रामेश्वर राठोड, संजीवनी सोनाळकर आणि करुणा कोंडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच राजर्षी शाहू विद्यामंदिराचे डॉ. अजितकुमार पाटील, उत्तम कुंभार, उत्तम पाटील, यादव, कल्पना पाटील आणि विद्या पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमासाठी महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे कर्मचारी योगेश जाधव, कुंडलिक पवार आणि वैभव सदने यांचेही सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार रावसाहेब कीर्तिकर यांनी मानले. शालेय विद्यार्थ्यांनी राबवलेला हा उपक्रम परिसरात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला.