उंचगाव, सरनोबतवाडी परिसरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस चौकी उभारा; शिवसेना आक्रमक!
schedule06 Aug 26 person by visibility 151 categoryसामाजिक
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील उंचगाव, सरनोबतवाडी, मुडशिंगी आणि मणेरमाळ परिसरात वाढत्या गुन्हेगारीला तातडीने आळा घालावा आणि उंचगाव येथे स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोतपाल यांना निवेदन देण्यात आले.
गांधीनगर पोलीस ठाण्याचे आंतर या गावांपासून जास्त असल्याने आणि गुन्हेगारीचा वाढता धोका पाहता जोपर्यंत पोलीस चौकी होत नाही, तोपर्यंत परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली.
निवेदनामध्ये उंचगाव गावाची लोकसंख्या ६० ते ७० हजारांवर असून, येथे सर्वसामान्य कष्टकरी व कामगार वर्ग मोठ्या संख्येने राहतो. हे करवीर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असल्याने येथे बाजारपेठ, मटन व भाजी मार्केटमध्ये कायम नागरिकांची मोठी गर्दी असते.
गेल्या दोन-तीन वर्षांत परिसरात एमडी पावडर व अमली पदार्थांच्या व्यसनात लहान मुलांपासून ते तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर अडकली आहे. व्यसनासाठी पैसे न मिळाल्यास चोऱ्या, मारामारी, लुटमारी आणि खुनासारखे गंभीर प्रकार सर्रास घडत आहेत.
गांधीनगर पोलीस ठाणे या गावांपासून अर्धा ते पाऊण तास अंतरावर असल्याने हद्दीच्या मर्यादा येतात. नुकतीच सरनोबतवाडी येथे एका परप्रांतीय महिलेच्या खुनाची घटना घडली, जिथे पोलिसांनी येईपर्यंत आरोपी फरार झाला होता. अशा घटना टाळण्यासाठी तात्काळ हालचाली होणे गरजेचे आहे.
रात्रीच्या वेळी उंचगाव बाजारपेठेत महिला व लहान मुलांची वर्दळ असते. तसेच मणेरमाळ परिसरात बाहेरून येऊन राहणाऱ्या लोकांची पुरेशी माहिती शेजाऱ्यांना नसल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे.
पोलिसांचे आश्वासन व उपस्थित शिष्टमंडळ
लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेत उंचगाव, सरनोबतवाडी, मुडशिंगी व मणेरमाळचा मध्यभाग असलेल्या उंचगावमध्ये तात्काळ पोलीस चौकी सुरू करावी, अशी आग्रही मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा समन्वयक विक्रम चौगुले यांनी केली.
जिल्हा पोलीस प्रमुख निलोतपाल यांनी निवेदन स्वीकारले असून, यावर गांभीर्याने विचार करून योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
या शिष्टमंडळात विक्रम चौगुले यांच्यासह विराग करी (उंचगाव ग्रामपंचायत सदस्य), महेश खांडेकर, अमोल पवार, अमर जाधव, अनिल माळी, गजानन येडूरकर, धनंजय पाटील, सागर पाटील, श्रीकांत पाटील, राम पाटील, दिनेश परमार, वाहतूक सेना जिल्हा समन्वयक दत्ता फराकटे, वाहतूक सेना तालुकाप्रमुख सतीश रेडेकर, सुरेश चव्हाण, अथर्व सूर्यवंशी, गजानन मछले, प्रमोद शिंदे आदी प्रमुख शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.