सामाजिक समता सप्ताह निमित्त विवेकानंद महाविद्यालयात व्याख्यान संपन्न
schedule10 Apr 26 person by visibility 121 categoryसामाजिक
कोल्हापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व विवेकानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत महाडच्या चवदार तळ्याचे शताब्दी वर्ष, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेले बहुमोल कार्य व महापुरुषांच्या विचारातून आजच्या युवकांचे योगदान या विषयावर विवेकानंद महाविद्यालय येथे प्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. जगन कराडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.कराडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून लोकांनी शिका, चेतवा व संघटित व्हा या मूलमंत्राने सामाजिक जीवन व्यथित केले पाहिजे, याबाबत जागृत असले पाहिजे, शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन बाबासाहेबांनी अनेक मोर्चे काढून सामूहिक शेतीचा पर्याय दिला. चवदार तळे हा पाण्याचा सत्याग्रह नसून मानवी हक्कांसाठी दिलेला महत्त्वाचा लढा होता आणि भारतीय संविधानाचा प्रारंभीचा बिंदू म्हणून नावारूपाला आला. राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या प्रबोधनाच्या वाटेवर चालताना अंधश्रद्धा, रुढी, परंपरा यांना टाळून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, सचिन साळे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे, महाविद्यालयाचे कुलसचिव अमित आव्हाड, वरीष्ठ समाज कल्याण निरीक्षक सुप्रिया काळे, समाज कल्याण निरीक्षक अतुल पवार, सुनील पाटील व इतर अधिकारी कर्मचारी, तालुका समन्वयक सचिन परब, समतादूत आशा रावण, सुनंदा मेटकरी, प्रतिभा सावंत, किरण कांबळे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक साळे यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. सपाटे यांनी केले.