कोल्हापूर: राजारामपुरीतील जबरी चोरीचा गुन्हा २४ तासांत उघड; २ लाखांचा मुद्देमाल जप्त
schedule30 May 26 person by visibility 116 categoryगुन्हे
कोल्हापूर: कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली जबरी चोरीची घटना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत उघडकीस आणली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण २ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही घटना २८ मे २०२६ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. शांतीनिकेतन स्कूलजवळील शांती कॅफेसमोर फिर्यादी महिला फिरण्यासाठी गेल्या असताना, तोंडाला पांढरा रुमाल बांधलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील १२.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. त्यानंतर तो आरोपी, त्याच्या साथीदारासोबत मोटारसायकलवरून शिवाजी विद्यापीठाच्या दिशेने पळून गेला होता. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. यानुसार, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी २९ मे २०२६ रोजी कणेवाडी, ता. करवीर परिसरात सापळा रचून अक्षय रामा कोरवी (वय २७, रा. यळगूड, जि. कोल्हापूर) आणि विजय बाळासाहेब सुर्वे (वय २७, रा. तेलंगवाडी, जि. सोलापूर) या दोन आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या टीमने केली आहे.