कोल्हापूर: गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांचा दणका; कणेरीवाडी व मोरेवाडीत मोठी कारवाई
schedule30 May 26 person by visibility 119 categoryगुन्हे
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या कडक आदेशानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत कणेरीवाडी आणि मोरेवाडी येथील गावठी हातभट्टीचे दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले असून, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
दिनांक २९ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कणेरीवाडी (ता. करवीर) येथील साईनगर, कंजारभाट वसाहतमध्ये छापा टाकला. या कारवाईत १२६० लिटर कच्चे व पक्के रसायन आणि ६० लिटर तयार दारू असा एकूण ७८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी काजल रोहित घारुंगे आणि प्रियंका संदिप घारुंगे या दोन महिलांवर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात, ३० मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा आणि राजारामपुरी पोलिसांनी संयुक्तपणे मोरेवाडी येथील कंजारभाट वसाहतीमध्ये धाड टाकली. येथे मोठ्या प्रमाणावर गावठी दारू निर्मितीचे अड्डे सुरू होते. पोलिसांनी २१०० लिटर रसायन आणि दारू तयार करण्याचे साहित्य असा १,२६,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि जेसीबीच्या साहाय्याने हे सर्व अड्डे जमीनदोस्त केले. याप्रकरणी प्रकाश जॅक्सन बागडे, रोहित प्रकाश माटुंगे, प्रमोद सुनिल बागडे, चरण विरसिंग बागडे आणि सुरज सुरेश गारुंगे या पाच जणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
केवळ या दोन कारवायाच नव्हे, तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस ठाण्यांकडून आतापर्यंत एकूण २१ कारवाया करून ५४४० लिटर रसायन नष्ट करण्यात आले आहे, तर ४,७४,६८० रुपये किमतीची १२९६ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. याशिवाय देशी-विदेशी दारूच्या ११ कारवाया करून प्रोव्ही कायद्यान्वये एकूण ३१ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. अवैध दारू निर्मिती, साठा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.