३ लाख मतदार प्रक्रियेतून वंचित राहण्याची भीती; सतेज पाटलांचा प्रशासनावर हल्लाबोल!
schedule27 Jun 26 person by visibility 219 categoryराज्य
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत नव्याने मतदार नोंदणी करणे आवश्यक असून, या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी (दि. २७ जून) कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
याविषयी आयोजित बैठकीला खासदार शाहू छत्रपती, शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शिवसेना उपनेते संजय पवार, कॉम्रेड उदय नारकर, काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, विरोधी पक्षनेते राजू लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे यांच्यासह 'इंडिया' आघाडीतील अनेक घटकपक्षांचे कार्यकर्ते आणि आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना आमदार सतेज पाटील म्हणाले की, सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ११.९९ टक्के म्हणजेच ३ ते ३.२५ लाख लोकांचे मॅपिंग अद्याप झालेले नाही, जे पुढील महिनाभरात पूर्ण होणे गरजेचे आहे. निवडणूक आयोगाची ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने जनजागृती करणे, वर्तमानपत्रात जाहिरात देणे, डिजिटल बोर्ड लावणे आणि ग्रामीण भागातील सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून माहिती पोहोचवणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, सध्या ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने आणि जनगणनेचे कामही सुरू असल्याने प्रशासनाने या कामासाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
जर मुदत वाढवून मिळत नसेल, तर किमान जिल्हा प्रशासनाने प्रत्येक ठिकाणी दोन बीएलओ (BLO) नियुक्त करावेत, कारण एका बीएलओद्वारे घर-टू-घर जाणे एक महिन्याच्या कालावधीत शक्य होणार नाही. या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे आणि ज्यांची नावे वगळली गेली आहेत त्यांनी प्रांताधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करावे, असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले आहे.