राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरू
schedule14 Aug 26 person by visibility 180 categoryमहानगरपालिका
◼️पावसाळ्यानंतर प्रलंबित कामांना वेग : आयुक्त डॉ.राजेद्र भारुड
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेने राज्य शासनाच्या विविध योजना तसेच महानगरपालिकेच्या स्वनिधीतून शहरात तब्बल १६६ कोटी ९३ लाख रुपयांची रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये मोठ्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह डांबरीकरण, दुरुस्ती, पॅचवर्क आणि मूलभूत सुविधांशी संबंधित कामांचा समावेश आहे.
सुवर्ण जयंती नगरोत्थानमधून १००.३३ कोटींची १६ रस्त्यांची कामे - महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत राज्यस्तरावर १००.३३ कोटी रुपये खर्चाची १६ प्रमुख रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांपैकी आजअखेर सुमारे ७० कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित सुमारे ३० कोटी रुपयांची कामे पावसाळा संपल्यानंतर पूर्ण करण्याचे नियोजन महानगरपालिकेने केले आहे.
कोल्हापूर शहरातील रस्त्यांची एकूण लांबी सुमारे १,०७९ किलोमीटर आहे. यामध्ये ९० किलोमीटर सिमेंट काँक्रिटचे, ८५२ किलोमीटर डांबरी, ९७ किलोमीटर खडीचे तर ४० किलोमीटर इतर प्रकारचे रस्ते आहेत. एवढ्या मोठ्या रस्ते जाळ्याची देखभाल व दुरुस्ती करण्यात येत आहेत.
विविध शासन योजनांतून ६१.९३ कोटींचा निधी - सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर), नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, मूलभूत सोयी-सुविधांचा विकास, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था अनुदान तसेच रस्ते अनुदान अशा विविध शासन योजनांतर्गत सुमारे ६१.९३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून बहुतांश कामांना कार्यादेश देण्यात आले असून काही कामांना प्रत्यक्ष सुरुवातही झाली आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये आवश्यकतेनुसार रस्ते सुधारणा व दुरुस्तीची कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहेत.
पॅचवर्कसाठी महापालिका स्वनिधीतून ५ कोटी - शहरातील रस्त्यांवरील खड्डे व खराब झालेल्या भागांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी महानगरपालिकेने स्वनिधीतून ५ कोटी रुपयांचा निधी पॅचवर्कसाठी उपलब्ध करून दिला आहे. पावसाळ्यात रस्त्यांची होणारी झीज लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी तातडीच्या दुरुस्तीची कामे करण्यावर भर देण्यात येत आहे.
डांबर दरवाढीचा काही कामांवर परिणाम - दरम्यान, आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराच्या दरात वाढ झाल्याचा परिणाम काही रस्ते कामांवर झाला आहे. त्यामुळे काही कामांचे कार्यादेश अद्याप संबंधित ठेकेदारांनी स्वीकारलेले नाहीत. तसेच सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्ते डांबरीकरणाची बहुतांश कामे तात्पुरती थांबविण्यात आली आहेत. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर प्रलंबित असलेली सर्व रस्ते कामे पुन्हा सुरू करून ती नियोजित कालावधीत पूर्ण करण्याचे महानगरपालिकेचे नियोजन आहे.
आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांचे रस्ते विकासाला प्राधान्य - शहरातील नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित आणि वाहतुकीसाठी सुलभ रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी रस्ते विकासाच्या कामांना विशेष प्राधान्य दिले आहे. उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करून शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचीही आवश्यकतेनुसार दुरुस्ती व सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यानंतर रस्ते विकासाची कामे गतीने पूर्ण करून नागरिकांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे.