कोल्हापूर: महायुतीची अमित शहांच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी; पाणी टंचाईवर मंत्री मुश्रीफ यांचे आश्वासन
schedule13 Jun 26 person by visibility 94 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर कार्यालयात आज शुक्रवारी, १२ जून रोजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आगामी कोल्हापूर दौरा, कोल्हापूरची पाणी समस्या, जात प्रमाणपत्राचा वाद आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १९ जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, तीर्थक्षेत्र अंबाबाई देवीसाठी त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी कोल्हापूरकर उत्सुक आहेत. या दौऱ्याचे नियोजन आणि तयारीसाठी महायुतीमधील तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक झाल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.
गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश तुरबतमठ यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुरू असलेल्या वादावर बोलताना मुश्रीफ यांनी नमूद केले की, बेडा-जंगम समाज हा अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असून, यापूर्वीही अनेकांना याचे लाभ मिळाले आहेत. या जात पडताळणीच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोल्हापूरच्या पाणी प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, काळम्मावाडी धरणाची गळती दुरुस्ती आणि उन्हाळ्यामुळे पाणी टंचाई निर्माण होण्याचा इशारा प्रशासनाने आधीच दिला होता. सध्या धरणातील पाणी जॅकवेलपासून लांब गेले असले तरी, कोल्हापूर शहराला पाणी कमी पडणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
राजकीय घडामोडींवर भाष्य करताना मुश्रीफ यांनी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या कथित विलीनीकरणाच्या चर्चांचा संदर्भ दिला. तसेच, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांचा समाचार घेताना मुश्रीफ म्हणाले की, राऊत यांनी दुसऱ्या पक्षांवर टीका करण्यापेक्षा आपल्या पक्षाची अवस्था पाहावी; काही दिवसांत त्यांचा पक्ष दुर्बिणीतून शोधावा लागेल अशी स्थिती आहे. सत्ता सोडून कोणीही तिकडे जाणार नाही, त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्यांसाठी दरवाजे उघडे आहेत, हे राऊत यांचे विधान केवळ भ्रमनिरास आहे.
आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनावर बोलताना त्यांनी ते स्वर्गीय अजितदादा पवार यांची जागा घेण्यासाठी धडपडत असल्याचा उपरोधिक टोला लगावला. कोल्हापूर जिल्हा आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय लवकरच उभे राहील आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या पक्ष सांभाळण्यास पूर्णपणे सक्षम असून कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत, असेही मंत्री मुश्रीफ यांनी या वेळी स्पष्ट केले.