पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सेवा रुग्णालय येथे प्रारंभ
schedule28 Jun 26 person by visibility 207 categoryराज्य
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवार 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ सेवा रुग्णालय, कसबा बावडा, येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने , जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे ,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सरिता थोरात,डॉ रेश्मा पाटील सेवा रुग्णालयाच्या अधिक्षक श्रीमती डॉ.पाटील , निवृत्त डॉ प्रवीण नाईक , इंडियन बँकेचे मुख्य व्यवस्थापक अजयसिंग तसेच शाखा व्यवस्थापक सुजित शिंदे आदी उपस्थित होते .
लसीकरण मोहिमेनंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते इंडियन बँकेच्या सीएसआर फंडातून जिल्हातील सुमारे 291 दिव्यांग लाभार्थ्यांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले .त्यानंतर पालकमंत्र्यांनी डायलिसिस विभागाला भेट देऊन तेथील विभागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पेटस्कॅन, सिटीस्कॅन ,एमआरआय , आयपीएचएल लॅबच्या बाबतीतील आढावा घेतला. यानंतर बोलताना पालकमंत्र्यांनी , सेवा रुग्णालय येथे सध्या सुरु असलेल्या उर्वशीत कामकाजाची गती वाढवून हे काम येत्या 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावे असे निर्देश दिले. यासाठी निधीची कमतरता जाणवणार नसल्याचेही श्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले .
या लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्यात येतात. दिनांक 1जानेवारी 2026च्या लोकसंख्येनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लाख 86 हजार 917 बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यासाठी जिल्ह्याभरात सुमारे 2 हजार 89 लसीकरण केंद्रे स्थापना करण्यात आली आहेत.
लसीकरणापासून कोणतेही बालक वंचित राहू नये यासाठी आय.पी .पी.आय ( घरभेट ) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 9 लाख 64 हजार 680 घरांना भेटी देण्यात येणार आहेत .साठी तब्बल 2 हजार 572 घरभेट पथके, 523 पर्यवेक्षक, 277 ट्रान्झिट टीम, 581 मोबाईल टीम तसेच 11 नाईट टीम कार्यरत राहणार आहेत . 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला नजीकच्या पल्स पोलिओ लसीकरण केंद्रावर नेऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब जरूर द्यावेत आणि पोलिओमुक्त भारत कायम राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व पालकांना करण्यात आले आहे .