"ऊस उत्पादकांच्या न्यायासाठी 'अन्नत्याग' यशस्वी; चुयेकर यांच्या संघर्षाची मुख्यमंत्र्यांकडून दखल"
schedule28 Jun 26 person by visibility 142 categoryसामाजिक
◼️माणिक पाटील चुयेकरांचे अन्नत्याग आंदोलन वाया जाणार नाही : आमदार चंद्रदीप नरके
कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारी यांच्या ज्वलंत प्रश्नांवर पदवीधर मित्र माणिक पाटील चुयेकर यांनी सलग आठ दिवस केलेल्या अन्नत्याग आंदोलनाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांनी केलेला हा त्याग वाया जाणार नाही, असे प्रतिपादन आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. माणिक पाटील चुयेकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.
आमदार नरके पुढे म्हणाले की, "शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यातील संघर्ष कायमचा संपवण्याचा माणिक पाटील यांनी खऱ्या अर्थाने प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी शेतकरी संघटना, साखर कारखानदार आणि सर्व राजकीय पक्षांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा भीमपराक्रम केला असून, यासाठी सर्व साखर कारखानदार त्यांचे कायम ऋणी राहतील." तसेच, चालू अधिवेशनात माणिक पाटील यांच्या या उपोषणाची माहिती आणि त्यामागील प्रश्न अनेक आमदार विधिमंडळ सभागृहात मांडतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
याप्रसंगी गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार आणि शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील, पी . के . पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य टी. के. किल्लेदार, आधीराज पाटील चुयेकर, बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब पाटील, कोल्हापूर रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे, आनंदा कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते. या अन्नत्याग आंदोलनाची सांगता आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते माणिक पाटील चुयेकर यांना सरबत पाजून करण्यात आली.
आज दिवसभरात कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर, गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजी पाटील, संचालक शिवाजी कारंडे, बी. के. डोंगळे यांच्यासह परिसरातील अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नेतेमंडळींनी आंदोलनस्थळी भेट दिली.