कळंब्यातील स्फोटाचे रहस्य उलगडले! दिवाणी वादातून घडवला होता जिलेटीनचा स्फोट; तीन आरोपींना अटक
schedule05 Aug 26 person by visibility 314 categoryगुन्हे
कोल्हापूर : महाराष्ट्र नगर, कळंबा येथील एका घरामध्ये जिलेटीनच्या स्फोटक कांड्यांचा वापर करून स्फोट घडवून आणण्याच्या गंभीर प्रकरणाचा कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अवघ्या काही तासांत पर्दाफाश केला आहे. जमिनीच्या जुन्या दिवाणी वादातून आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी हा स्फोट घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
◼️नक्की काय घडले होते?
दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेसातच्या सुमारास कळंबा रिंग रोडवरील रणवरे कॉलनीतील प्लॉट नंबर ६७ मधील घरामध्ये अचानक एक जोरदार स्फोट झाला. या भीषण स्फोटामुळे घराच्या भिंती कोसळल्या आणि शेजारील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध BNS कलम ३३२, १२५, ३२४(४) सह भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ३, ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
◼️दिवाणी वादातून रचला होता कट
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास चक्र वेगाने फिरवले. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी प्रज्योत दीपक पवार (वय २४, रा. बापूरामनगर, कळंबा) आणि मनिष पेठे यांच्यामध्ये प्लॉट नंबर ६७ च्या मिळकतीबाबत दिवाणी वाद सुरू होता.
मनिष पेठे हा प्रज्योत पवार याला मिळकतीत गेल्यानंतर "तू भिकारी आहेस, चोरटा आहेस" असे म्हणून हिणवायचा तसेच शिवीगाळ व दमदाटी करायचा. याच अपमानाचा राग मनात धरून प्रज्योतने ते घर पाडण्याचा निर्णय घेतला. जेसीबीने घर पाडल्यास मनिष पेठे पुन्हा दंगा करेल, या विचारातून त्याने घर थेट उडवून देण्याचा (ब्लास्ट करण्याचा) खतरनाक कट रचला.
◼️स्फोटकांचे ज्ञान असलेल्या साथीदारांची मदत
ब्लास्टिंगचे तांत्रिक ज्ञान असलेले अभिजित प्रभाकर चौगले (वय २४) आणि प्रसाद दीपक चौगले (वय २३, दोन्ही रा. परिते, ता. करवीर) यांच्याशी प्रज्योतने संगनमत केले. या तिघांनी मिळून घराची रेकी केली आणि घरात अनाधिकृतपणे जिलेटीनच्या कांड्या वापरून हा स्फोट घडवून आणल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी करवीर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली LCB चे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व त्यांच्या पथकाने पार पाडली आहे.