निवडणूक जिंकल्यावर डी. वाय. दादा, बंटी आणि माझे अभिनंदन करायचे...; हसन मुश्रीफ यांनी जागवल्या आठवणी
schedule05 Aug 26 person by visibility 317 categoryराज्य
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात डॉ. डी. वाय. पाटील यांचे योगदान अफाट आहे. एका अत्यंत सामान्य कुटुंबातील तरुण स्व-धाडसाच्या जोरावर एवढ्या मोठ्या पदावर आणि शिखरावर पोहोचला. निवडणुकांमधील राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांनी मला नेहमी जवळ केले, मार्गदर्शन केले आणि अभिनंदनही केले. सतेज पाटील आणि मी काही निवडणुका एकत्र लढवल्या. निवडणूक जिंकल्यानंतर आम्हाला बोलवून आमचे अभिनंदन करायचे या शब्दांत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्या आठवणी बुधवारी जागवल्या.
मंत्री मुश्रीफ यांनी कसबा बावड्यातील यशवंत निवासस्थानी डॉ. डी.वाय.पाटील यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. मंत्री मुश्रीफ म्हणाले, दादांशी माझे कौटुंबिक स्नेहाचे संबंध होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही डॉ. डी.वाय.पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दानवे म्हणाले, डॉ. डी. वाय. पाटील यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात बहुआयामी काम केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श घ्यावे असे कार्य त्यांनी उभे केले असून, आजच्या नवीन पिढीने त्यांच्या या कर्तृत्वाचा नक्कीच आदर्श घेतला पाहिजे.
माजी खासदार संभाजीराजे म्हणाले, डी. वाय. दादांनी शिक्षण व इतर सर्वच क्षेत्रांत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम केले. आमचे आजोबा छत्रपती शहाजी महाराज आणि दादांचे अतिशय घनिष्ट संबंध होते; दोघांचा एकमेकांवर अथांग विश्वास होता. माझे आणि त्यांचे नाते इतके आपुलकीचे होते की, माझा असा एकही वाढदिवस गेला नाही ज्या दिवशी त्यांनी मला आठवणीने शुभेच्छा दिल्या नाहीत.
◼️डी. वाय. पाटील यांच्या निधनाने संपूर्ण समाजाची अपरिमित हानी : खासदार शाहू छत्रपती
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने केवळ एका क्षेत्राची नव्हे, तर संपूर्ण समाजाची अपरिमित हानी झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि योगदानामुळे बहुजन समाजातील हजारो मुला-मुलींना शिक्षणाची संधी मिळाली. आज ही मुले विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. मनापासून गप्पा मारणारे आणि आपुलकीने भेटणारे व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. या शब्दांत खासदार शाहू छत्रपती यांनी डॉ. डी.वाय.पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.
उद्यागमंत्री उदय सामंत म्हणाले, दादांचे आणि माझे संबंध राजकारणा पलीकडचे होते. आपल्या मुलांप्रमाणेच ते मला मार्गदर्शन आणि सहकार्य करायचे.
डी वाय पाटील यांच्या जाण्याने पाटील कुटुंबाचे जसे नुकसान झाले तसेच महाराष्ट्राचे आणि वैयक्तिक माझे सुद्धा नुकसान झाल आहे.पंधरा दिवसापूर्वी मी जेव्हा कोल्हापूर दौऱ्यावर होतो. तेव्हा डी वाय दादा यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. त्यांच्या निधनाने फार मोठे व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून निघून गेल आहे.
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले डॉ. डी. वाय. पाटील यांनी अतिशय कष्टाने शैक्षणिक विश्व निर्माण केले. आपुलकीच्या भावनेने त्यांनी सर्वांना प्रेम दिले. त्यांनी सेवाभावाचा मोठा वारसा मागे ठेवला असून हा वारसा त्यांची मुले अधिक प्रकाशमान करतील, याचा विश्वास आहे.
माजी अर्थमंत्री आमदार जयंत पाटील म्हणाले डी वाय दादा अजातशत्रू आणि मोठ्या मनाचे होते. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी मोठे यश मिळवले, उत्तम विद्यापीठ, उत्तम संस्था उभ्या केल्या. त्यांची मुले चांगले काम करत आहेत. ही संस्था ते आणखी मोठी करतील. विशेष करून आमचे मित्र सतेज पाटील कर्तबगारीने काम करतील
दादा हे चांगले शेतकरी होते. शेतीसाठी घेतलेली मशीन बापूंना दाखवायला एकदा ते आले होते अशी आठवण त्यांनी सांगितली.
आमदार अमित देशमुख म्हणाले, डी वाय पाटील साहेबांचा त्या काळात माझे वडील विलासराव देशमुख यांच्याशी सातत्याने संवाद राहिला आहे. त्यांच्यात विविध विषयांवर सल्ला मसलत होत असे.
विलासराव देशमुख साहेबांना नेहमीच डी वाय दादांचा कौतुक असायचे. शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर त्यांनी काम केले. अशी माणसे जेव्हा निघून जातात तेव्हा आपल खूप मोठे नुकसान होते.
आमदार शिवाजी पाटील म्हणाले डी. वाय. पाटील दादा यांनी शिक्षण, क्रीडासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. त्यांच्या निधनाने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. हा माझा परिवार आहे, माझ्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे.