जगाच्या कल्याणासाठी मनुष्याने शाश्वत जीवनशैली पुढे घेवून जाणे आवश्यक : सिध्दार्थ शिंदे
schedule29 May 26 person by visibility 103 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : जगाच्या कल्याणासाठी मनुष्याने शाश्वत जीवनशैली पुढे घेवून जाणे आवश्यक आहे. आर्थिक चक्रास चालना देण्याच्या प्रयत्नांत आपले शाश्वत विकासाकडे दूर्लक्ष होऊ नये, असे प्रतिपादन व्यवस्थापन परिषद सदस्य सिध्दार्थ शिंदे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे सामाजिक समावेशन अभ्यास केंद्र आणि इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या गणित अधिविभागातील सभागृहामध्ये 'ई-कचरा व्यवस्थापन आणि शाश्वतता' या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास शिंदे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
सिध्दार्थ शिंदे पुढे बोलताना म्हणाले, संगणक, लॅपटॉप, टॅब, मोबाईल फोन, चार्जर यामधील बॅटरी यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे हे जगासमोर मोठे आवाहन ठरत आहे. त्याचबरोबर, काळानुरूप मोठयाप्रमाणात वापरात येत असलेल्या इलेक्ट्रीक वाहनांच्या बॅटरीचे योग्य पध्दतीने विल्हेवाट करण्यासाठी आवश्यक ते संशोधन करण्याची मोठी संधी विद्यापीठास प्राप्त झालेली आहे. या संशोधनामधून नवीन उद्योगाची निर्मिती होवू शकते. वापरा आणि फेका वस्तूंबरोबरच कमी किंमतीत मिळणारे साधने पुढे आपणांस खूप घातक ठरू शकतात. यामध्ये असलेले रसायने भूजल पातळीमध्ये मिसळल्याने अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. आपणच आपल्या विनाशाचे कारण बनत आहोत. ई-कचरा निर्माण होवू नये यासाठी समाजामध्ये मोठयाप्रमाणात जागृकता निर्माण झाली पाहिजे. आपणाकडून होत असलेल्या प्लास्टिकचा वापर आणि ई-कचरा निर्मिती याकडे संवेदनशीलपणे पाहणे आवश्यक आहे. प्लास्टिकचे सूक्ष्मकण मानवाच्या शरीरामध्ये आढळून येत आहेत, हे खूप गंभीर आहे. कमी कमी गॅजेटस्चा वापर आणि पूर्नवापर करण्याकडे विद्यार्थ्यानी कटाक्षाने पाहिले पाहिजे. भविष्यात मोठयाप्रमाणात आवश्यक असलेले हायड्रोजन इंधन प्रकल्प पुढे कसे घेवून जाता येईल हे विद्यापीठाने पहावे. त्याची निर्मिती आणि साठा याकडेही विशेष लक्ष केंद्रीत करून आवश्यक ते संशोधन करावे. नवीन सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी विद्यापीठातील संशोधक आणि प्राध्यापकांनी मोठे योगदान देणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना कुलसचिव डॉ.विलास शिंदे म्हणाले - एका महत्वपूर्ण अहवालानुसार 66 दशलक्ष टन गोळा झालेल्या ई-कचऱ्यामध्ये पाच दशलक्ष टन कचरा हा केवळ मोबाईलचा होता. यापैकी फक्त 22.3 टक्के ई-कचरा हा पुर्नप्रक्रीयेमध्ये जातो. इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये वापरात येत असलेल्या 22 मूलद्रव्यांपैकी अत्यंत दूर्मिळ मूल्यद्रव्य म्हणजे लिथीयम. आपल्याच देशाकडे मूबलक प्रमाणात लिथीयमचा साठा असावा याकरिता सगळेच राष्ट्र प्रयत्नशील आहेत. भविष्यात यामुळे जगाचा भूगोलही कदाचित बदलू शकतो. आरोग्यास हानिकार असलेल्या ई-कचऱ्यामधील मूल्यद्रव्ये पाण्यात मिसळल्याने त्याचा मानवी शरीरावर मोठयाप्रमाणात आघात परिणाम होवू शकतो. शंभर वर्षे होत आले तरी आपण याकडे गांभीर्याने पहात नाही.
2010 साली ई-कचरा चौतीस दशलक्ष टन होता. 2030 साली एेंशी दशलक्ष टन इतका ई-कचरा तयार होण्याची शक्यता संशोधकांनी बोलावून दाखविली आहे. जुन्या गॅझेटस्कडून नवीनकडे जाताना आपण जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. एखादे उपकरण तयार करण्यासाठी विविध खनीज इंधनाबरोबरच 22 किलो वेगवेगळया प्रकारचे रसायने आणि दिडटन पाण्याचा वापर एक संगणक तयार करण्यासाठी होत असतो. किती संसाधनांचा यामध्ये वापर होतो, याचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. समाजामध्ये याबाबत जागृती निर्माण झाली पाहिजे. चांगले अन्न, शुध्द पाणी आणि शुध्द हवा मिळण्याची शाश्वतता राखावयाची असेल तर ई-कचरा वातावरणात मिसळू नये, याची जाणीव प्रत्येकांमध्ये येणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सामाजिक समावेश अभ्यास केंद्राचे संचालक डॉ.मुरलीधर भानारकर यांनी केले. डॉ.किशोर खिल्लारे यांनी आभार मानेल. डॉ.अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास इलेक्ट्रॉनिक्स् अधिविभागाचे डॉ.पी.ए.कदम, तंत्रज्ञान अधिविभागाचे डॉ.अजित कोळेकर, आनंद खामकर, दिनेश उथळे, शरद पाटील, उदय पोवार, विनोद लोखंडे यांचेसह शिक्षक, संशोधक विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.