आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
schedule18 Mar 26 person by visibility 98 categoryराज्य
मुंबई : आराजी असलेल्या शेत जमिनीबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी आराजी असलेली वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली.
सदस्य सचिन अहिर यांनी या विषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मौजा भिवी ( ता. भिवापूर जि.नागपूर) येथील सर्वोदय सहकारी सामुदायिक शेती सोसायटीच्या नावावर असलेल्या आराजी जमिनीचे वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरण व्यवहार प्रकरण २०२२ मध्ये घडले. या प्रकरणाची तक्रार २०२५ मध्ये करण्यात आली. तक्रारीनुसार या व्यवहाराची चौकशी करण्यात येत असून कायदेशीर मार्गाने रक्कम वसूल करून संबंधित शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात आराजी असलेली शेत जमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करणे या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आले असून सुमारे १३ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.