साता समुद्रापारही दुमदुमला 'विठ्ठल विठ्ठल'चा गजर; जर्मनीतील आषाढी वारीने जपली महाराष्ट्राची भक्तीपरंपरा
schedule27 Jul 26 person by visibility 200 categoryराज्य
कोल्हापूर (राजेंद्र मकोटे) : आषाढी एकादशी म्हटली की डोळ्यासमोर उभी राहते ती पंढरपूरच्या दिशेने चालणारी लाखो वारकऱ्यांची दिंडी, टाळ-मृदुंगाचा गजर आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषाने भारलेले वातावरण. मात्र यंदा हीच भक्तीची परंपरा साता समुद्रापार जर्मनीतही तितक्याच उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात अनुभवायला मिळाली.
जर्मनीतील प्रमुख हेरलबर्ग शहरात महाराष्ट्रासह भारताच्या विविध राज्यांतील नागरिकांनी एकत्र येत विठ्ठल-रखुमाईची आषाढी वारी साजरी केली.
पारंपरिक बैलगाडीऐवजी आकर्षक सजवलेल्या जीपमध्ये विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. भगव्या पताका, टाळ-मृदुंगाचा निनाद, हरिपाठ, अभंग आणि त्याला आधुनिकतेची जोड देणाऱ्या गिटारच्या सुरांनी संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम पाहून उपस्थित प्रत्येकजण भारावून गेला.
"भाषा, देश आणि संस्कृती यांच्या सीमा ओलांडून विठ्ठल भक्तीने सर्वांना एका सूत्रात बांधल्याचे मनोहारी चित्र येथे पाहायला मिळाले."
या वारीत महाराष्ट्राबरोबरच गोवा, कर्नाटक, केरळ आणि पंजाबमधील भारतीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, स्थानिक जर्मन युवक-युवतींनीही यात उत्स्फूर्त सहभाग घेत वारकरी परंपरेचा आनंद अनुभवला.
आठ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या विठ्ठल व गणेश मंदिरात कीर्तन, भजन, हरिपाठ आणि महाप्रसादाने या वैश्विक आषाढी वारीची सांगता झाली. पंढरपूरच्या वारीची अनुभूती जणू जर्मनीच्या भूमीवरच साकार झाली होती.
कोल्हापूरचे मूळ रहिवासी असलेले आणि सध्या जर्मनीत वास्तव्यास असलेले गायत्री व अतुल वाळवेकर यांनी या सोहळ्याचे आयोजन आणि सहभागात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्यासोबत शाहूपुरी येथील त्यांचे पालक अनिता व नरेंद्र पाटील यांनीही वारीत सहभागी होत, "जर्मनीतच इंद्रायणी काठीच्या पंढरपूरची अनुभूती मिळाली," अशी भावूक भावना व्यक्त केली.
सध्या या वैश्विक आषाढी वारीचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, लाखो भाविकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वारकरी संप्रदायाची भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असल्याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणाने भौगोलिक अंतरही क्षणात विरघळते आणि "अवघा रंग एक झाला" या संतवचनाचा प्रत्यय जर्मनीच्या भूमीवर पुन्हा एकदा आला.