मतदार यादीत नाव कायम राहील याची मतदारांनी खात्री करून घ्या : मतदार नोंदणी अधिकारी मोसमी चौगुले
schedule03 Aug 26 person by visibility 94 categoryराज्य
कोल्हापूर : लोकशाही प्रक्रियेत मतदार यादी अद्ययावत ठेवणे करीता प्रत्येक मतदाराने आपले EF भरून देणे बंधनकारक आहे. या करिता सर्व मतदारांनी या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात सक्रिय सहकार्य करून गणना अर्ज भरून आपले नाव मतदार यादीत कायम राहील, याची मतदारांनी खात्री करून घ्यावी, असे आवाहन मतदान नोंदणी अधिकारी 274- कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघ तथा करवीर उप विभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision SIR-2026) कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश प्रत्येक पात्र मतदाराची माहिती अद्ययावत करून मतदार यादी अचूक, पारदर्शक व त्रुटीरहित करणे हा आहे. या अनुषंगाने संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officer BLO) आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन गणना अर्ज (Enumeration Form) दोन प्रतीमध्ये वितरित करीत आहेत. तसेच अर्ज भरून घेण्यासाठी व आवश्यक माहिती पडताळण्यासाठी बी.एल.ओ नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देत आहेत.
ज्या मतदारांची पहिल्या भेटीत भेट होऊ शकली नाही, अशा मतदारांच्या घरी बी.एल.ओ यांनी किमान तीन वेळा भेटी देण्याची कार्यवाही केली आहे. मात्र विशेषतः लक्षतीर्थ वसाहत, राज्योपाध्येनगर, सानेगुरुजी वसाहत, सुर्वेनगर रिंगरोड, साळोखेनगर, संभाजीनगर, तोरणानगर, अवचितनगर, सम्राटनगर, बाबा जरगनगर, शेंडापार्क, राजेंद्रनगर, टेंबलाईवाडी, मोरेवाडी-पाचगाव, उचगाव, गांधीनगर व मुडशिंगी या भागांमध्ये मोठ्या संख्येने मतदार प्रत्यक्ष भेटीदरम्यान उपलब्ध झालेले नाहीत.
यामुळे अद्यापही सुमारे 88 हजार 800 मतदारांनी आपले गणना अर्ज भरून संबंधित बी.एल.ओ यांच्याकडे सादर केलेले नाहीत. अशा मतदारांची मतदान केंद्रनिहाय नावे असलेली यादी संबंधित बी.एल.ओ यांना उपलब्ध करून देण्यात आली असून तो सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या Booth Level Agents (BLA) निदर्शनास आणून देण्याबाबतही बी.एल.ओ यांना निर्देश देण्यात आले आहेत.
या यादीतील मतदारांच्या मतदार यादीत नमूद असलेल्या पत्त्यावर संबंधित बी.एल.ओ यांनी तीन तीन वेळा गृह भेट देवून गणना अर्जाचे वितरण केले असून अद्याप काही मतदारांनी आपले गणना अर्ज भरून दिलेले नाहीत अशा मतदारांच्या घरी 8 ऑगस्ट पूर्वी अंतिमतः गृहभेट देणार आहेत. या अंतिम भेटीदरम्यान संबंधित मतदारांनी आपला गणना अर्ज पूर्णपणे भरून आवश्यक कागदपत्रांसह बी.एल.ओ यांच्याकडे जमा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदारांनी विशेष नोंद घ्यावी की, ज्या मतदारांचे गणना अर्ज दिनांक 8 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतीत संबंधित बी.एल.ओ यांच्याकडे प्राप्त होणार नाहीत, अशा मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात येतील. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मतदाराची राहील. सर्व पात्र मतदारांनी आपल्या बी.एल.ओ यांच्याशी संपर्क साधून गणना अर्ज भरून द्यावा. ज्या मतदारांना गणना अर्ज प्राप्त झाला नसेल किंवा अधिक माहितीसाठी संपर्क साधावयाचा असेल त्यांनी संबंधित बी.एल.ओ यांचेशी संपर्क साधावा. भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर भेट देवून आपण आपले बी.एल.ओ कोण आहेत हे शोधू शकता. या संकेतस्थळावर आपला मतदार ओळखपत्र क्रमांक नमुद करून बी.एल.ओ यांची माहीती सहज प्राप्त करून घेवू शकतात.