सेंद्रिय खत, ठिबक सिंचन आणि योग्य लागण हीच उत्पादनवाढीची गुरुकिल्ली : डॉ. संजीव माने
schedule03 Aug 26 person by visibility 133 categoryउद्योग
▪️शरद सहकारी साखर कारखाना व
दि डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असो. च्या संयुक्त विद्यमाने ऊस पिक परिसंवाद संपन्न
शिरटी : ऊस उत्पादन वाढवायचे असेल तर सर्वप्रथम जमिनीची सुपीकता वाढविणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने लागण करणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ रासायनिक खतांच्या वापराने उत्पादन वाढत नाही, तर सेंद्रिय खतांचा वापर, मृदास्वास्थ्य, योग्य सरींचे अंतर आणि शास्त्रशुद्ध पाणी व्यवस्थापन यावर भर दिल्यास एकरी १०० टन उत्पादन घेता येईल. मध्यम व हलक्या जमिनीत चार फूट, तर काळ्या जमिनीत पाच फूट अंतरावर लागण करून पॉवर टिलरद्वारे भरणी, शेणखत, कंपोस्ट किंवा हिरवळीच्या खताचा वापर केल्याशिवाय शाश्वत उत्पादनवाढ शक्य नाही, असे मत कृषी तज्ज्ञ डॉ. संजीव माने यांनी मांडले.
शरद सहकारी साखर कारखाना व
दि डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडीया), पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित ऊस पिक परिसंवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक सुभाषसिंग रजपूत यांनी केले.
यावेळी संजीव माने पुढे म्हणाले, मी स्वतः २०-२२ टन उत्पादनापासून सुरुवात केली; मात्र शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, सातत्याने प्रयोग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यामुळे एकरी उत्पादन ९८ टनांपर्यंत, तर पुढे १६८ टनांपर्यंत नेण्यात यश मिळाले, असे कृषी तज्ज्ञ डॉ. संजीव माने यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, उत्पादनवाढीसाठी संशोधन संस्थांचे मार्गदर्शन, सुधारित ऊस वाणांची निवड, ठिबक सिंचन, संतुलित खत व्यवस्थापन आणि शास्त्रोक्त पीक संरक्षण या बाबींवर भर देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पद्धतीवर अवलंबून न राहता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला, तर उत्पादनात मोठी वाढ साधता येईल. संशोधन केंद्रे, कृषी विद्यापीठे आणि साखर कारखान्यांच्या ऊस विकास विभागाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात प्रयोगशील वृत्ती ठेवावी. कमी खर्चात अधिक उत्पादन आणि अधिक नफा मिळविण्याचा मार्ग हा शास्त्रोक्त शेतीतच दडलेला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी दि डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडीया), पुणे यांच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रमेश गंगाई यांचा सत्कार करण्यात आला. गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्द्ल आमदार यड्रावकर यांचा शेतकरी बांधवाकडून सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, शिरोळ तालुक्यातील शेती अधिक सक्षम, शाश्वत आणि उत्पादनक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे, साखर कारखान्यांची संख्या वाढली असली तरी ऊस गाळपाचा कालावधी कमी होत आहे. त्यामुळे केवळ क्षमता वाढवून चालणार नाही, तर एकरी उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा लागेल. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञान, मृदा व पाणी परीक्षण, ठिबक सिंचन आणि आधुनिक शेती पद्धतींचा शेतकऱ्यांनी स्वीकार करणे आवश्यक आहे. एआय तंत्रज्ञानामुळे पीक व्यवस्थापन अधिक अचूक होऊन उत्पादनवाढीस मदत होईल. शिरोळ तालुक्यात राज्यातील पहिला क्षारपडमुक्तीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून, त्यासाठी शासनाकडून ८० टक्के अनुदान दिले जात आहे. उर्वरित २० टक्के शेतकरी हिस्सा देखील माफ व्हावा, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. क्षारपड जमिनी पुन्हा सुपीक झाल्यास हजारो एकर क्षेत्र शेतीयोग्य होईल.
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच व्यापारी दृष्टिकोन स्वीकारावा. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सेंद्रिय पर्याय, आधुनिक तंत्रज्ञान, कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि सहकारी साखर कारखान्यांच्या योजनांचा लाभ घ्यावा. पुढील पाच वर्षांत प्रत्येक एकरातील उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवून सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे, असे आवाहनही आमदार यड्रावकर यांनी केले.
दि डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडीया), पुणेचे संचालक सोहन शिरगांकर यांनी आपल्या मनोगतातून शेतकच्या ऊस पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी आम्ही काम करत आहोत. तज्ञांच्या सल्याने उत्पादनात वाढ करता येते, यासाठी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपले उत्पन्न वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले.
आदित्य पाटील यड्रावकर म्हणाले, गेल्या पंचवीस वर्षांपासून आमचे दैवत स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या तत्वातून आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली काररखाण्याची वाटचाल सुरू आहे. आमदार साहेब शिरोळ तालुक्यात क्षारपड मुक्तिचा पायलट प्रोजेक्ट राबवित आहेत, याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगितले.
यावेळी मृदा शास्त्रज्ञ डॉ. एन.बी. मोरे यांनी शिरोळ तालुक्यात अति पाण्यामुळे क्षारपड क्षेत्र वाढत आहे, त्यामुळे शेत सुपिक ठेवण्यासाठी ठिबकनेच शेताला पाणी दिले पाहिजे. पिकांचे फेरफार, निचरा प्रणाली योग्य ठेवल्यास आपले उत्पादन नक्कीच वाढेल असे सांगितले.
या प्रसंगी डॉ. दशरथ ठवाळ, एम.व्ही. बोखारे, अमरसिंह पाटील, राजेंद्र हसुरे, संचालक आणासो सुतार, जयपाल कुंभोजे, लक्ष्मण चौगुले, कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे, शेती अधिकारी सुधाकर पाटील,
कलाप्पा खवाटे, जयपाल शिरगावे, अशोक चौगुले, सुर्यकांत उदगावे, शातिनाथ चौगुले, राजु ढेकळे, गोपाळ माळी, विपुल कोगनोळे, पोपट चौगुले, प्रदिप पाटील, सुरेश टारे, मदन मस्के,आण्णासो ककडे, आदिनाथ आरबाळे यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.