विकसित भारताच्या निर्मितीत शिक्षकांचे योगदान मोलाचे : केंद्र मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील
schedule31 Jul 26 person by visibility 159 categoryशैक्षणिक
कोल्हापूर, कसबा बावडा येथील जीवन कल्याण माध्यमिक विद्यालयात मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र. ११ सी.आर.सी. ७ अंतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद अत्यंत उत्साहात पार पडली. या परिषदेचे उद्घाटन केंद्र मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील, विद्या पाटील, वैशाली पाटील, अर्चना पाटील, छाया हिरुगडे, पद्मिनी माने आणि कुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रोपास पाणी घालून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर मागील महिन्याचा आढावा व संपूर्ण रूपरेखा केंद्र मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील यांनी मांडली. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (NEP) नुसार नवीन अध्यापन पद्धती व अभ्यासक्रमात होणारे नावीन्यपूर्ण बदल स्वीकारून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांचे विचार, संवाद कौशल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नैतिक मूल्ये रुजवत त्यांना व्यावसायिक शिक्षणात सक्षम बनवणे आवश्यक आहे. भारताचे भविष्य घडवण्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे महत्त्वाचे असून आनंदी शनिवार, इको क्लब, 'एक पेड मॉ के नाम' यांसारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना दर्जेदार बनवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. विकसित भारत घडवण्याचे स्वप्न शाळांच्या भौतिक व शैक्षणिक सुविधायुक्त वर्गखोल्यांमधूनच साकार होणार असून, २१ व्या शतकात भारत झेप घेत असताना सजग विद्यार्थी घडवण्याचे प्रामाणिक कार्य शिक्षक करत आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
परिषदेमध्ये तज्ञ सुलभक म्हणून माधवी सौंदलगे, संदीपकुमार शिंगे, उत्तम पोवार, टी. आर. पाटील, गोरख वातकर आणि सरदार पाटील यांनी आपल्या विचारांची व अनुभваंची देवाणघेवाण करत सायबर सुरक्षा, पालक-शाळा व्यवस्थापन समिती, आनापान साधना आणि मित्र उपक्रम या विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट कार्यनियोजनाबद्दल श्री गणेश विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुप्रिया पाटील, आयडॉल टीचर एस. ए. पाटील आणि पद्मिनी माने यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, राज्यस्तरीय विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. उत्कृष्ट सूत्रसंचालन केल्याबद्दल सरदार पाटील यांचाही विशेष सत्कार झाला. कार्यक्रमाचा समारोप करताना आभार सारिका पाटील यांनी मानले.