कोल्हापुरात मुसळधार पावसाचा जोर कायम; ३३ बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पातळी ३० फुटांवर
schedule05 Jul 26 person by visibility 189 categoryराज्य
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून जिल्ह्यात सरासरी ५२.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पावसाचा विचार करता गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १४३.१ मि.मी. इतका विक्रमी पाऊस झाला आहे, तर भुदरगड (८५.९ मि.मी.) आणि राधानगरी (८१ मि.मी.) तालुक्यांतही मुसळधार पाऊस झाला आहे.
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून, आज दुपारी ४ वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी ३० फुटांवर पोहोचली आहे. तेथून सध्या ३०,३३६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पाणीपातळी सध्या इशारा पातळीपेक्षा (३९ फूट) खाली असल्याने नदीकाठच्या भागात कोणताही तातडीचा पूरधोका निर्माण झालेला नाही, मात्र जिल्ह्यातील एकूण २९९ पैकी ३३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २ राज्यमार्ग, २ प्रमुख जिल्हा मार्ग, २ ग्रामीण मार्ग आणि १ इतर जिल्हा मार्ग असे एकूण ७ रस्ते वाहतुकीसाठी बाधित झाले आहेत. मात्र, सुदैवाने रेल्वे वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. धरणांच्या पाणीसाठ्याचा विचार केल्यास, राधानगरी धरणात सध्या ३२ टक्के पाणीसाठा असून धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद आहेत. याशिवाय तुळशी धरणात ३८ टक्के, वारणा धरणात २४ टक्के आणि दूधगंगा धरणात ८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून वारणा व दूधगंगा धरणातून प्रत्येकी १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोणत्याही कुटुंबाचे स्थलांतर करण्याची आवश्यकता भासलेली नसून जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महसूल व पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.