इंडिया माईस जीवनगौरव पुरस्काराने डॉ. संजय डी. पाटील यांचा सन्मान
schedule26 Feb 26 person by visibility 180 categoryसामाजिक
◼️पुणे येथील सोहळ्यात हॉटेल सयाजीचाही गौरव
कोल्हापूर : हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना 'इंडिया माईस जीवनगौरव' पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे झालेल्या 'इंडिया माईस अवार्ड’ सोहळ्यात उदयपुर राजघराण्याच्या निवृत्ती कुमारी मेवाड यांच्याहस्ते डॉ. संजय डी. पाटील यांना गौरविण्यात आले. त्याचबरोबर हॉटेल सयाजीचे व्यवस्थापकिय संचालक रौफ धनानी आणि कोल्हापूरमधील हॉटेल सयाजी यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
भारतातील मीटिंग्स, इन्सेंटिव्ह्स, कॉन्फरन्स आणि एक्झिबिशन (MICE) पर्यटन क्षेत्रातील सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या ‘इंडिया माईस अवॉर्ड्स’ सोहळा पुण्यात संपन्न झाला. यावेळी देशभरातील हॉटेल व्यावसायिक, कन्व्हेन्शन सेंटर्स, डेस्टिनेशन मॅनेजमेंट कंपन्या, एअरलाईन्स, पर्यटन मंडळे आणि इव्हेंट प्रोफेशनल्स यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतातील पहिले आणि एकमेव 'माईस' पर्यटन मासिक असलेल्या 'ट्रॅव्हटूर माईस गाईड' कडून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. भारतातील पर्यटन उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हे मासिक सलग १२ वर्षांपासून या पुरस्कारांचे आयोजन करत आहे.
या कार्यक्रमात कोल्हापूरमध्ये हॉटेल सयाजी या पंचतारांकित हॉटेलच्या माध्यमातून, खानपान, निवास, पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. उदयपूरच्या निवृत्ती कुमारी मेवाड यांच्या हस्ते डॉ. पाटील यानी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी आयोजक 'ट्रॅव्हटूर माईस गाईड'चे संपादक अरविंद शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात सयाजी हॉटेलचे एमडी रौफ धनानी यांना ‘हॉटेलियर ऑफ द इयर’ सन्मान प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर हॉस्पीटलिटी क्षेत्रात कोल्हापूरची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सयाजी हॉटेलचा 'बेस्ट बिझनेस हॉटेल इन महाराष्ट्र’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
डॉ. संजय डी. पाटील यांनी २०१५ मध्ये ‘हॉटेल सयाजी’च्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये जागतिक दर्जाच्या हॉस्पीटलिटी सुविधा उपलब्ध करून दिल्या. पर्यटन आणि उद्योग क्षेत्रातील वाढत्या गरजा ओळखून त्यांनी आधुनिक बँक्वेट हॉल्स, आलिशान निवास व्यवस्था, उत्तम रेस्टोरंटस आणि प्रशिक्षित कर्मचारीवर्ग यावर विशेष भर दिला. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांचे यशस्वी आयोजन आणि स्वच्छता व सेवेमधील सातत्य यामुळे हॉटेल सयाजीने वेगळे स्थान निर्माण केले आहे. या योगदानाबद्दल हा गौरव करण्यात आला.