कोल्हापूरच्या विकासात आणि शिक्षण क्षेत्रात डॉ. डी. वाय. पाटील यांचे योगदान अमूल्य - खा. धनंजय महाडिक
schedule08 Aug 26 person by visibility 435 categoryसामाजिक
कोल्हापूर : कोल्हापूरचे सुपुत्र डॉ. डी. वाय. पाटील यांनी ५०-६0 वर्षांपूर्वी, जेव्हा कोणतेही आर्थिक संसाधने, जागा किंवा चांगले लोक उपलब्ध नव्हते, अशा कठीण काळात कोल्हापुरात शिक्षण संस्थांची सुरुवात केली. कोल्हापूरसह मुंबई, पुणे, राज्यभरात, देशामध्ये आणि परदेशामध्ये त्यांनी आपल्या संस्थांचे मोठे जाळे निर्माण केले. सामान्य कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण, इंजिनिअरिंग, डिप्लोमा आणि मेडिकलसारख्या सुविधा उपलब्ध करून देत त्यांनी उच्चशिक्षित व उच्चविभूषित विद्यार्थी घडवण्याचे मोठे कार्य केले, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
कोल्हापूरचे सुपुत्र डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना आणि सहकाऱ्यांना भेटण्यासाठी खा. धनंजय महाडिक यांनी पाटील कुटुंबियांची भेट घेतली आणि सांत्वन केले.
यावेळी बोलताना त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.
ते पुढे म्हणाले की, आज अनेक संसाधने उपलब्ध असतानाही संस्था उभी करणे सोपे नाही, परंतु त्या काहींमध्ये त्यांनी हे विश्व उभे केले. कोल्हापूरच्या भरभराटीमध्ये आणि ज्ञानार्जनामध्ये त्यांचे मोठे योगदान असून, त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे चिरंजीव संजय पाटील आणि आमदार सतेज पाटील हे कर्तृत्ववान लोक असून त्यांनी ही संस्था वाढवली आहे आणि हॉस्पिटल्सचा विस्तार केला आहे. दादांनी लावलेल्या वटवृक्षाची सावली संपूर्ण कोल्हापूरवर कायम राहील, अशी व्यवस्था त्यांनी करून ठेवली आहे.
या भेटीदरम्यान खा. महाडिक यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आठवणींना उजाळा दिला. आपण २००४ मध्ये लोकसभा निवडणूक लढलो होतो आणि पराभूत झालो होतो, त्यानंतर महिनाभरातच आभार दौऱ्यानिमित्त आपण डॉ. डी. वाय. पाटील यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी, "या पराभवाने निराश होऊ नका, लवकरच तू खासदार होणार," असा सल्ला दिला होता. पुढे २०१४ मध्ये आपण लोकसभेवर निवडून गेलो आणि त्यानंतरही अनेकदा त्यांच्या भेटीचे योग आले, अशी आठवण त्यांनी सांगितली.
असे महान व्यक्ती खूप कमी जन्माला येतात, ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात समाजासाठी मोठे काम केले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना खा. धनंजय महाडिक यांनी केली.
यावेळी सौ. अरूंधती महाडिक यांनीही पाटील कुटूंबियांशी संवाद साधत, त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले. यावेळी महापौर रूपाराणी निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव, भाजपचे महेश जाधव, विजय जाधव यांनीही, स्वर्गीय डी वाय पाटील यांना अभिवादन करून, पाटील कुटूंबियांचे सांत्वन केले.
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराज देसाई यांनीही पाटील कुटूंबियाची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. स्वर्गीय बाळासाहेब देसाई आणि डॉ. डी वाय पाटील एकाच वेळी राजकारणात सक्रीय झाल्यामुळे पाटील कुटुंबियांशी आपले स्नेहाचे संबंध आहेत, अशा शब्दात नामदार देसाई यांनी डॉ. डी वाय पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.