कोल्हापुरात ‘मिलेट रॅली’द्वारे पौष्टिक तृणधान्यांचा जागर
schedule22 Mar 26 person by visibility 152 categoryसामाजिक
कोल्हापूर : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा आणि नागरिकांमध्ये पौष्टिक आहाराबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने कृषी विभाग, कोल्हापूर यांच्या वतीने २१ व २२ मार्च रोजी ‘जिल्हास्तरीय धान्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला. ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षा’निमित्त २२ मार्च रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर यांच्यामार्फत काढण्यात आलेल्या ‘मिलेट रॅली’ला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर-नरवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुनील कराड, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, पोपट पाटील व किरण पाटील, कृषी उपसंचालक नामदेव परीट यांची प्रमुख उपस्थिती होती.
पारंपरिक वेशभूषेत महिला बाईक रायडर्सनी यामध्ये सहभाग घेतला. दसरा चौक येथून सुरू झालेली ही रॅली बिंदू चौक, उमा टॉकीज चौक, बागल चौक आणि जनता बाजार चौक मार्गे व्ही. टी. पाटील स्मृती भवन येथे संपन्न झाली. रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे कृषी विभागातील महिला अधिकारी व कर्मचारी यांनी पारंपरिक नऊवारी साडी आणि भारतीय पेहरावात दुचाकींवरून नोंदवलेला सहभाग. या रॅलीच्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्ये (Millets), गळीतधान्ये आणि रसायनमुक्त शेतीमालाच्या वापराबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली.
बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी आहारात तृणधान्यांचा समावेश करणे ही काळाची गरज आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राजगिरा यांसारखी तृणधान्ये लोह, कॅल्शियम आणि झिंकने समृद्ध असून ती ग्लुटेनमुक्त आहेत. ही पिके मधुमेह, हृदयविकार आणि उच्च रक्तदाब रोखण्यास मदत करतात. जिल्ह्यात वर्षभर तृणधान्यांचा प्रचार करण्यासाठी कृषी विभागामार्फत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
▪️शेतकरी ते ग्राहक थेट जोडणी
राज्याच्या कृषी विकासात कृषी विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे हे विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे. सेंद्रिय शेती, तृणधान्यांचे उत्पादन व वापर वाढविणे, महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि शेतमालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.


