वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापुरात महत्त्वपूर्ण प्रेस कॉन्फरन्स; ऊस, गोकुळ आणि 'शक्तिपीठ'बाबत रोखठोक भूमिका
schedule21 Aug 26 person by visibility 150 categoryराजकीय
कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, शेंडा पार्क येथे आयोजित पत्रकार परिषदेत वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी राज्यातील विविध ज्वलंत आणि महत्त्वाच्या राजकीय तसेच सामाजिक विषयांवर सविस्तर भाष्य केले. या पत्रकार परिषदेत प्रामुख्याने साखर आयात, ऊस उत्पादक शेतकरी आणि 'गोकुळ' दूध संघ या विषयांवर त्यांनी दिलेली उत्तरं केंद्रस्थानी राहिली.
साखर आयात आणि ऊस उत्पादकांचे भवितव्य
भारतात सुरू असलेल्या साखर आयातीवर बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, यंदा देशात गाळप हंगाम अत्यंत कमी चालला असून कारखाने ९० दिवसही चाललेले नाहीत. जगात ब्राझीलकडून साखरेचा जागतिक पुरवठा होतो, परंतु अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे ब्राझीलने इथेनॉल निर्मितीचे धोरण स्वीकारले आहे. यामुळे साखरेचे दर वाढले असले तरी देशात साखरच शिल्लक नसल्यामुळे कारखाने आणि पर्यायाने शेतकऱ्यांना याचा फारसा फायदा होणार नाही.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखरेच्या आयातीमुळे व्यापाऱ्यांना फायदा होईल आणि २० ते २२ हजार कोटींचा काळाबाजार होईल असा आरोप केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, केंद्र सरकारने साठेबाजीवर नियंत्रण ठेवले असून याचे दृश्य परिणाम लवकरच दिसून येतील. मात्र, या धोरणाचा साखर कारखान्यांना मोठा फायदा होणार नाही, हे निश्चित आहे.
'गोकुळ' निवडणुकीबाबत आमदार सतेज पाटलांना प्रत्युत्तर
आमदार सतेज पाटील यांनी 'गोकुळची निवडणूक एकदा झालीच पाहिजे, म्हणजे शेतकरी कोणाच्या बाजूने आहे ते समजेल,' अशी टीका केली होती. यावर पलटवार करताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, सतेज पाटील यांचा मोठा भ्रमनिरास होईल. त्यांनी अशा वल्गना करू नयेत, आगामी निवडणुकीत महायुतीच्या सर्व २५च्या २५ जागा दणदणीत फरकाने निवडून येतील.
शक्तिपीठ महामार्ग आणि स्थानिकांची भूमिका
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगली आणि कोल्हापुरात सुरू असलेल्या शेतकरी मोर्च्यांवर बोलताना मुश्रीफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, हा महामार्ग त्यांच्या बोरवडे आणि उंदरवाडी या मतदारसंघातील गावातून जातो, जी गावे त्यांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याची आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महामार्ग करण्याचा निर्णय घेतला असून, सध्या पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्या मतदारसंघातून हा मार्ग जात असल्याने, स्थानिकांचे जास्तीत जास्त नुकसान कसे टाळता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
बाळूमामा देवस्थानमधील अपहार आणि एसआयटी चौकशी
आदमापूरच्या श्री. बाळूमामा देवस्थानमधील कथित अपहाराबाबत बोलताना त्यांनी एसआयटी (SIT) चौकशीचे स्वागत केले. देवालयाची लूट ही जनतेच्या भावनेची लूट असून चौकशी अत्यंत पारदर्शक झाली पाहिजे, गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच, शिर्डी व सिद्धिविनायकच्या धर्तीवर या मंदिरासाठीही स्वतंत्र ट्रस्ट स्थापन करावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.
जेन झी (Gen Z) आणि राजकारण: तरुणाईने केलेल्या आंदोलनांमुळे राज्यकर्ते आणि विरोधक खडबडून जागे झाले असून, तरुण पिढीला आपलंसं करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
शरद पवार आणि पार्थ पवार भेट: पवार कुटुंबातील ज्येष्ठांच्या भेटीला अनावश्यक राजकीय वलय देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.
सीसीएमपी कायदा (CCMP): होमिओपॅथी डॉक्टरांच्या प्रॅक्टिसबाबत गेल्या १२ वर्षांपासून उच्च न्यायालयात सुरू असलेली कायदेशीर लढाई लवकरात लवकर संपावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
खाजगी रुग्णालयांचे खोलीभाडे: सरकारी रुग्णालयांमध्ये असे दर नसले तरी खाजगी रुग्णालयांच्या खोलीभाडे आणि सेवा-सुविधांच्या नियमनासाठी समिती नेमली असून लवकरच कायदा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.