आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पुढाकारातून क्षारपडमुक्ती प्रकल्पाला वेग
schedule07 Apr 26 person by visibility 230 categoryराज्य
◼️मेन लाईनचे कामही अंतिम टप्प्यात ; शेतकऱ्यांचा वाढता सहभाग
जयसिंगपूर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पुढाकारातून आलास (ता. शिरोळ) येथे सुरू झालेल्या राज्यातील पहिल्याच क्षारपडमुक्ती पायलट प्रोजेक्टने आता वेग पकडला असून शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उपक्रमाला नवी ऊर्जा देत आहे. अनेक वर्षांपासून क्षारपड जमिनीमुळे उत्पादन घटलेले व कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले शेतकरी आता या योजनेकडे आशेने पाहत आहेत. भूमिगत चर प्रणालीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नापीक जमीन पुन्हा सुपीक करण्याचा हा प्रयत्न केवळ एका गावापुरता मर्यादित न राहता राज्याच्या शेतीला नवी दिशा देणारा ठरत आहे.
शिरोळ तालुक्यातील आलास येथे सुरू असलेल्या राज्यातील पहिल्या क्षारपडमुक्ती पायलट प्रोजेक्टच्या कामाला सध्या उल्लेखनीय गती मिळाली असून शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उपक्रमाला मिळत आहे. अनेक वर्षांपासून क्षारपड समस्येमुळे नापीक बनलेल्या जमिनीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. उत्पादन घटणे, खर्च वाढणे आणि कर्जाचे ओझे वाढणे या समस्यांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प दिलासादायक ठरत आहे.
या प्रकल्पांतर्गत भूमिगत चर (Underground Drainage System) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या प्रणालीद्वारे जमिनीत साचलेले अतिरिक्त आणि क्षारयुक्त पाणी बाहेर काढले जाते, ज्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण हळूहळू कमी होऊन सुपीकता पुनर्संचयित होते. सध्या या प्रकल्पाच्या मुख्य लाईनचे सुमारे ५० - ६० टक्के काम पूर्ण झाले असून सबलाईन टाकण्याचे कामही वेगाने सुरू आहे. नियोजनबद्ध पद्धतीने काम राबवले जात असल्यामुळे येत्या एका महिन्यात ६० ते ७० एकर क्षेत्रात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.
या योजनेत शासनाकडून ८० टक्के आर्थिक सहाय्य दिले जात असून शेतकऱ्यांचा केवळ २० टक्के आर्थिक सहभाग आहे. हा सहभागही जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून सुलभ कर्जरूपाने उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांनाही या प्रकल्पात सहभागी होणे शक्य झाले आहे. याशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कर्जावरील व्याज सवलतीसारखे लाभ मिळत असल्याने त्यांचा सहभाग अधिक वाढताना दिसत आहे.
प्रकल्पाच्या कामाची प्रगती पाहून शेतकऱ्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. अनेक शेतकरी स्वयंस्फूर्तीने या योजनेत सहभागी होत असून आपल्या नापीक जमिनी पुन्हा उत्पादनक्षम करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
'आतापर्यंत पाणी असूनही शेती करणे अशक्य झाले होते, पण आता या प्रकल्पामुळे पुन्हा शेती बहरण्याची आशा निर्माण झाली आहे,' अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वारंवार घेतलेल्या आढाव्यामुळे कामाचा वेग कायम राखण्यात यश आले असून शेतकऱ्यांचा विश्वासही दृढ होत आहे.
आलास येथील हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास त्याचा फायदा केवळ या गावापुरता मर्यादित राहणार नाही' राज्यातील मोठ्या प्रमाणावर असलेली क्षारपड जमीन पुन्हा लागवडीखाली येण्याचा मार्ग मोकळा होईल. अंदाजे दोन ते अडीच लाख हेक्टर क्षेत्र पुन्हा उत्पादनक्षम होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, कर्जाचे ओझे कमी होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.
एकूणच, आलास येथे सुरू असलेला क्षारपडमुक्ती प्रकल्प हा केवळ एक विकास उपक्रम नसून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारा महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शासनाचे पाठबळ आणि शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग यांच्या जोरावर हा प्रकल्प यशस्वी होणार असून तो भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक ठरणार आहे, हे मात्र नक्की.