सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तावडे हॉटेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेचा हातोडा कधी पडणार?, शिवसेनेसह जिल्हाप्रमुखांचा सवाल
schedule08 May 26 person by visibility 114 categoryराज्य
कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका आणि उचगाव ग्रामपंचायत हद्दीतील बेकायदेशीर बांधकामांच्या प्रश्नावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. तावडे हॉटेल आणि गांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला असून, या निकालाची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात माहिती देताना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले आणि तालुकाप्रमुख राजू यादव यांनी सांगितले की, शिवसेनेच्या वतीने २०१२ पासून या बेकायदेशीर बांधकामांविरोधात लढा दिला जात आहे. आंदोलने, गांधीनगर बंद आणि कायदेशीर पाठपुराव्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे प्रशासनाला बंधनकारक आहे. हा निकाल म्हणजे नियमबाह्य कामे करणाऱ्यांना चपराक असून, प्रशासनाने आता कोणताही विलंब न लावता ही अतिक्रमणे जमीनदोस्त करावीत.
जर प्रशासनाने या बांधकामांना अभय देण्याचा प्रयत्न केला किंवा कारवाईत दिरंगाई केली, तर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. तसेच, या बेकायदेशीर बांधकामांना खतपाणी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही शासनाच्या नियमानुसार कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. अन्यथा, या प्रकरणावर दाद मागण्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे.
यावेळी मंजित माने, राजू सांगावकर, सागर साळोखे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.