अधिकाऱ्यांनो, जनतेचा अंत पाहू नका; २७ जूनपर्यंत पाणी न मिळाल्यास गाठ आमच्याशी आहे!
schedule07 May 26 person by visibility 122 categoryसामाजिक
🟣 कोल्हापुरात १३ गावांतील जनतेचा 'महाराष्ट्र जीवन प्राधिकरण'वर विराट 'घागर मोर्चा'; ऋतुराज पाटलांचा आक्रमक पवित्रा
कोल्हापूर : "पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं," अशा घोषणांनी आज कोल्हापूरचा कावळा नाका परिसर दणाणून गेला. गांधीनगर प्रादेशिक १३ गावांतील पाणीप्रश्नावरून माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) कार्यालयावर धडक 'घागर मोर्चा' काढण्यात आला. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामातील प्रचंड विलंब, निकृष्ट दर्जा आणि वारंवार खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या हजारो महिला आणि ग्रामस्थांनी रिकाम्या घागरींसह प्रशासनाला धारेवर धरले.
गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या या योजनेचे काम केवळ ५१ टक्केच पूर्ण झाले आहे. उकरलेले रस्ते, सततची पाईपलाईन गळती आणि १०-१० दिवस पाणी न मिळणे यामुळे १३ गावांतील ३ लाखांहून अधिक जनता होरपळत आहे. कणेरी जलशुद्धीकरण केंद्रावरील बैठकीत ग्रामस्थांचा रोष अनावर झाल्यानंतर, आज हा संताप मोर्चाच्या रूपाने रस्त्यावर उतरला. यावेळी महिलांनी रिकाम्या घागरी वाजवत प्रशासनाचा तीव्र निषेध केला.
"लोकांच्या पिण्याच्या पाण्याशी खेळू नका. जर २७ जूनपर्यंत ही योजना पूर्ण झाली नाही, तर यापुढे आमच्याकडून कोणत्याही सहकार्याची अपेक्षा ठेवू नका. जनतेचा रोष काय असतो, हे मग तुम्हाला समजेल!" असा इशारा माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिला
मोर्चाच्या आक्रमक पवित्र्यापुढे अधिकारी हतबल झाले. ऋतुराज पाटील यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत लेखी आश्वासनाची मागणी लावून धरली. अखेर, २७ जून २०२६ पर्यंत ही योजना पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिले. मात्र, या मुदतीत काम न झाल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा आणि आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
नवीन योजना रेंगाळत असताना जुन्या योजनेचे मोटार पंप बिघडणे आणि दुरुस्तीला विलंब होणे यावरही पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. "नवीन योजना होईल तेव्हा होईल, पण किमान जुन्या योजनेतून तरी नियमित पाणी द्या," अशी आर्त हाक यावेळी सरपंच आणि ग्रामस्थांनी दिली.
या मोर्चात आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऋतुराज पाटील यांच्यासह १३ गावांतील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ सहभागी झाले होते.