पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती घ्या; योजनांचा लाभ घेऊन पशुपालन व्यवसायाला चालना द्या : पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. दीपाली भुतकर
schedule20 Sep 26 person by visibility 146 categoryउद्योग
कोल्हापूर : ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच शेतकरी व पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. पशुपालन, दुग्धव्यवसाय, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन तसेच पशुधन उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या योजनांची माहिती घेऊन पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. दीपाली भुतकर यांनी केले.
पट्टणकोडोली, हुपरे नगर येथील सिद्धिविनायक गणेश उत्सव मंडळ येथे आयोजित ‘लोकसंवाद’ कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष ओमकार सावंत, खजिनदार श्रीकांत आवटे मंडळाचे पदाधिकारी तसेच स्थानिक युवक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागात पशुधनावर आधारित व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंरोजगार व उद्योजकतेला चालना देणे हा पशुसंवर्धन खात्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. ONE HEALTH संकल्पने नुसार सुदृढ पशु आरोग्य, शास्त्रीय अतिउत्पादनक्षम पशुपैदास, सकस पौष्टिक पशु आहार, व सुयोग्य पशु व्यवस्थापन या चतु:सूत्रीवर भविष्यातील दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर होऊ शकतो.
त्याकरिता आपले दुग्धव्यवसायात तयार होणारे इतर दुग्धजण्य पदार्थ जे "Value addable product " आहेत ते भविष्यातील लोकसंख्येला सकस अन्न पुरविणे करिता व परदेशात निर्यात करण्या करिता आवश्यक मानकानुसार गरजेचे असणारे लाळखुरकत रोग मुक्त होणेकरिता पशुसंवर्धन विभागामार्फत व्यापक स्वरूपात लसीकरण मोहीम राबविली जाते. पशुधन रोगमुक्त राहून प्राणिजण्य आजार टाळून त्यातून सकस दूध, दुग्धजण्य पदार्थ, मांस, अंडी निर्मिती करणेसाठी PPR, लम्पि चर्मरोग, ब्रुसेल्ला, अँटिरॅबीज लसीकरण या योजनांचा पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे सांगून श्रीमती भूतकर पुढे म्हणाल्या, आधुनिक शास्त्रीय पशुपैदास करिता पशुसंवर्धन विभागामार्फत अत्यल्प दराने उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या "लिंग निर्धारित वीर्यमात्रा " वापरून अधिक उत्पादनक्षम पशुधन निर्मितीसाठी या योजनेचा ही पशुपालकांनी लाभ घ्यावा.
अल निनो प्रभावामुळे भविष्यातील वैरण तूट लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाचे चारा साक्षरता अभियान व वैरण विकास योजनेंतर्गत वाटप होणारे 100% अनुदानवरील बियाणे या योजनामधून तयार होणारा अतिरिक्त चारा आज मुरघास, युरिया व ओझोन ट्रीटमेंट सारखे आधुनिक शास्त्रीय उपाय वापरून तरुण पिढी यामधून रोजगार व व्यवसाय निर्मिती करू शकते. त्यातून उपलब्ध सकस पशु चारा वैरण टंचाई असलेल्या भागात उपलब्ध करून देता येईल.
तसेच आपले बहुमूल्य पशुधनाचे अकाली अथवा आपत्ती मुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्या करिता 85 % अनुदानावर विमा योजनेचा लाभ घेण्या करिता आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून त्यांच्या कानातील बिल्ला व पशुधन मालकीच्या आधार क्रमांकाच्या आपल्या नोंदी अद्ययावत करून घेऊन सदर योजनेचाही तत्पर लाभ घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.
पशुपालकांनी आपल्या गरजेनुसार उपलब्ध योजनांची माहिती घेऊन पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, अनुदानाचे निकष व अंतिम मुदत याबाबत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना, तालुका पशुसंवर्धन कार्यालय किंवा संबंधित पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध योजना व शासन निर्णयांची माहिती पाहूनच अर्ज करावा.
पशुपालन व्यवसायातून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पशुपालक, शेतकरी, महिला बचत गट व पात्र उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही श्रीमती भूतकर यांनी यावेळी केले.
राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. सार्वजनिक लोकसहभागातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम १६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे.
शासनाच्या योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, आणि पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा ‘लोकसंवाद-२०२६’चा प्रमुख उद्देश आहे.