कॉपीमुक्त अभियान विद्यार्थ्यांच्या सहभागातूनच यशस्वी होईल: दीपक अडगळे
schedule12 Apr 26 person by visibility 111 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांतील परीक्षा निकोप, पारदर्शक व विश्वासार्ह वातावरणात पार पडण्यासाठी विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे उपकुलसचिव दीपक अडगळे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र तसेच सांगली व सातारा विभागीय केंद्राच्या वतीने अभ्यासकेंद्र समन्वयक व विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘कॉपीमुक्त अभियान : एक चळवळ’ या विषयावरील ऑनलाइन विशेष व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमास दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा पाटील, उपकुलसचिव श्री. विनय शिंदे, समन्वयक, सहायक प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाइन उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अडगळे म्हणाले की, महाविद्यालयीन परीक्षा काळात कॉपी किंवा तत्सम कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी केंद्रप्रमुख, कनिष्ठ व वरिष्ठ पर्यवेक्षक तसेच विद्यार्थ्यांनी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्यांवर भरारी पथकाकडून कडक कारवाई केली जाईल व परीक्षा प्रमाद समितीच्या शिक्षेस सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. विद्यार्थ्यांमधील कॉपी करण्याची प्रवृत्ती नष्ट करून विद्यापीठाच्या परीक्षांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कॉपीमुक्त अभियानात सहभागी व्हावे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी संचालक डॉ. कृष्णा पाटील यांनी ‘परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, परीक्षेत यश मिळवण्यासाठी वेळेचे योग्य व्यवस्थापन व प्रामाणिकपणा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी अभ्यासाचे पाच आधारस्तंभ स्पष्ट केले; नियोजनबद्ध अभ्यास, पुनरावृत्ती व लेखन सराव, मानसिक तयारी, आरोग्य व एकाग्रता, तसेच शिस्त व नैतिकता. “कॉपी ही यशाची वाट नसून ती आत्मविश्वास हरविण्याची सुरुवात आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अडगळे व डॉ. कृष्णा पाटील यांनी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सातारा विभागीय केंद्राचे समन्वयक डॉ. सूर्यकांत गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नितीन रणदिवे यांनी केले, तर आभार डॉ. चांगदेव बंडगर यांनी मानले.