शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेची : न्या.अभय आहुजा
schedule15 Mar 26 person by visibility 112 categoryराज्य
कोल्हापूर : संविधानातील कलम 39 (अ) अन्वये सर्व नागरिकांना समान न्याय व अधिकार आहे .यामध्ये कोणताही भेदाभेद नाही.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेची असल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा कोल्हापूरचे पालक न्यायमूर्ती अभय आहुजा यांनी केले .
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, कोल्हापूर व जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका कोल्हापूर व इचलकरंजी तसेच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (CPR) यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबीर तथा शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा रविवार 15 मार्च रोजी जिल्हा व सत्र न्यायालय परिसर कसबा बावडा येथे आयोजित करण्यात आला होता.या महाशिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते .
व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा कोल्हापूरचे पालक न्यायमूर्ती गौतम अंखड , कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती रणजीत राजेभोसले, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष कविता अग्रवाल,जिल्हाधिकारी अमोल येडगे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही . आर .पाटील आदी उपस्थित होते.
न्या.आहूजा म्हणाले, राज्य घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य,दर्जेदार शिक्षण व समान न्यायाचा अधिकार दिला आहे.अशा शिबिरामधून एकाच छताखाली काही शासकीय योजना मिळण्यास मदत होते ही बाब कौतुकास्पद आहे .
न्या.अंखड म्हणाले, समाजातील वंचितांना या शिबिराद्वारे न्याय मिळण्यास निश्चित मदत होईल .तसेच संबंधित विभागाकडून वंचितांना न्याय - मदत देण्याचा हा प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे सांगून पुढील महा शिबिरामध्ये आपण मराठीतून भाषण करू असे सांगितल्यानंतर उपस्थिती त्याला टाळ्यांच्या गजरात दाद दिली. तर या शिबिराचा लाभ संबंधितांनी घ्यावा असे आवाहन करून या महाशिबिर आयोजना पाठीमागील भूमिका श्रीमती अग्रवाल यांनी आपल्या प्रास्ताविकात केली .
या शिबिराच्या माध्यमातून प्रशासनाच्या विविध 50 हून अधिक विभागांमार्फत समाजातील गरजू घटकांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ आणि कायदेशीर मार्गदर्शन मिळवून देण्याचा या शिबिराचा उद्देश असल्याचे सांगून भविष्यातही संबंधितांना अशा शिबिरांद्वारे लाभ दिला जाईल असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी शासनाच्या 32 हून अधिक विभागांमार्फत संबंधित गरजूंना विविध वस्तूचा लाभ देण्यात आला .यामध्ये व्हील चेअर,रोलेटर, कानाचे मशिन्स,मिनी ट्रॅक्टर,वॉकर,ड्रोन,घरकुल चावी,आपदा मित्रांसाठी कीट,गृहपयोगी वस्तूंचा संच,मनरेगा अनुदान प्रमाणपत्र,बियाणे पिशवी तसेच वारसा नोंद प्रमाणपत्र वाटप करण्यात आले याप्रसंगी बालविवाह सारख्या ज्वलंत प्रश्नावर प्रबोधन करणारे पथनाट्य संजय घोडावत विद्यापीठाच्या तर शेतीचा वाद सामंजस्याने निपटारा करणारे पथनाट्य शहाजी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले .या दोन्ही पथनाट्याला मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त अशी दाद दिली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दिपाली डोईफोडे यांनी केले.कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर संबंधित मान्यवरांनी स्टॉलची पाहणी केली .या कार्यक्रमासाठी इतर न्यायाधीश, विधिज्ञ, संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी लाभार्थी तसेच विधि महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .