समाजशास्त्राची जाणीव असलेल्या नेतृत्वाकडूनच समाज परिवर्तन : पृथ्वीराज चव्हाण
schedule28 Feb 26 person by visibility 121 categoryशैक्षणिक
▪️कराडमध्ये इतिहास परिषदेचे २८ वे अधिवेशन उत्साहात
कोल्हापूर : समाजात परिवर्तन घडविण्यासाठी समाजशास्त्राचे अध्ययन आणि इतिहासाचे सकारात्मक संशोधन या दोन बाबींच्या महत्त्वाची जाणीव असणारे नेतृत्व विकसित होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड येथे केले.
येथील शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद आणि कराड येथील सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. टी.एस. पाटील होते.
पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात समाजशास्त्र आणि इतिहास यांच्या परस्परसंबंधावर भाष्य केले. ते म्हणाले, सुजाण नेतृत्वाला समाजशास्त्राची जाण आणि भान असणे आवश्यक असते. त्यासाठी विद्यापीठे केवळ पदवीदानाची केंद्रे न राहता ज्ञाननिर्मितीची सक्रिय केंद्रे बनली पाहिजेत. त्या माध्यमातून संशोधनाच्या नव्या वाटा खुल्या झाल्या पाहिजेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने इतिहास संशोधन अधिक व्यापक होण्याच्या दृष्टीने शासनाने स्वतंत्र संशोधन निधी निर्माण करणे आवश्यक आहेच, पण उद्योजकांनीही संशोधकांना आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे. मराठा इतिहास व्यापक समाजासमोर प्रभावीपणे मांडायचा असेल, तर मोडी कागदपत्रांचा शास्त्रशुद्ध अभ्यास अपरिहार्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. टी. एस. पाटील म्हणाले, इतिहासकार विज्ञाननिष्ठ असला पाहिजे. इतिहासलेखनात वस्तुनिष्ठता, चिकित्सक दृष्टी आणि निर्भीडपणाही आवश्यक असून इतिहास लेखन हे भावनांपेक्षा पुराव्यांवर आधारित असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ. अवनीश पाटील, प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ, अॅड. रविंद्र पवार, डॉ. संदीप महाजन, डॉ. सुनील जाधव, डॉ. सुरेखा पाटील, डॉ. अजित पवार, इतिहासाचे शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. अभयकुमार पाटील यांनी आभार मानले.