माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या ‘एनव्हिजनिंग इंडिया’च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
schedule18 Apr 26 person by visibility 154 categoryशैक्षणिक
मुंबई : मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या ‘एनव्हिजनिंग इंडिया’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन गुरूवारी मुंबईतील नेहरू सेंटर येथे पद्मविभूषण प्रा. मनमोहन शर्मा, गोदरेज अर्काईव्ह कौन्सिलचे अध्यक्ष फिरोजा गोदरेज, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, रिलायन्स इनोव्हेशन लीडरशिप सेंटरचे प्रमुख सुशील बोर्डे , तसेच प्रकाशक शीतल बागवे आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. मनमोहन शर्मा यांनी या पुस्तकाला “योग्य वेळी केलेला बौद्धिक हस्तक्षेप” असे संबोधले. विशेषतः बदलती जागतिक समीकरणे आणि देशांतर्गत अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाची उपयुक्तता अधिक अधोरेखित होते. धोरणात्मक चर्चेला अधिक सखोल संरचनात्मक प्रश्नांशी जोडण्याची या पुस्तकाची क्षमता त्याला अधिक महत्त्वपूर्ण बनवते. पहिल्या आवृत्तीच्या संकल्पनांवर आधार घेत, ती भारतातील बदलत्या सामाजिक-आर्थिक आणि वैज्ञानिक वास्तवाशी संवाद साधते, असे प्रा. शर्मा यांनी सांगितले.
कुमार केतकर यांनी पुस्तकाच्या समकालीन वास्तवाशी साधलेल्या सूक्ष्म संवादाकडे लक्ष वेधले. त्यांनी नमूद केले की, हे पुस्तक कोणत्याही ठराविक विचारसरणीच्या चौकटीत अडकत नाही, तर प्रत्यक्ष निरीक्षणांवर आधारित आहे.
डॉ. फिरोजा गोदरेज यांनी आर्थिक प्रगतीमध्ये सामाजिक जबाबदारीचा समावेश महत्त्वाचा असल्याचे नमूद करत, भविष्यातील विकास मॉडेल्सची विश्वासार्हता यावरच अवलंबून असेल, असे मत व्यक्त केले.
सुशील बोर्डे यांनी पुस्तकाच्या रचनात्मक सुसंगततेचे आणि सुलभतेचे कौतुक केले, तर शीतल बागवे यांनी व्यापक सार्वजनिक चर्चेला चालना देण्याच्या त्याच्या क्षमतेवर भर दिला.
आपल्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीवर मनोगत व्यक्त करताना प्रा. देशमुख यांनी ही आवृत्ती म्हणजे अंतिम निष्कर्ष न मानता, सुरू असलेल्या संवादाचा एक भाग असल्याचे आवर्जून सांगितले. त्यांनी सातत्याने बौद्धिक नवचेतनेची गरज अधोरेखित केली आणि ज्ञानाधिष्ठित विकास हा भारताच्या भवितव्याचा महत्त्वाचा घटक असल्याचे स्पष्ट केले.
◼️पुस्तकाचे वैशिष्ट्ये
ऑ ‘एनव्हिजनिंग इंडिया’ हे पुस्तक संक्रमणाच्या टप्प्यातील भारताचे चित्र मांडण्याचा प्रयत्न करते, जिथे लोकसंख्यात्मक बदल, तंत्रज्ञानातील प्रगती आणि पर्यावरणीय आव्हाने एकमेकांना छेद देतात. या गुंतागुंतीच्या परस्परसंबंधावर सखोल विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असलेल्या आव्हानांप्रमाणे सादर करणे हे पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
◼️अनुत्तरीत प्रश्नांवर उत्तर
ही आवृत्ती बदलत्या भारताशी नव्याने संवाद साधण्याचा प्रयत्न करते. अलीकडील घडामोडींचा समावेश करत पुस्तकाचा आवाका वाढविण्यात आला असून, विकास आणि समता, नवोन्मेष आणि शाश्वतता तसेच महत्त्वाकांक्षा आणि संस्थात्मक बळकटी यांतील संतुलनासारख्या अद्याप अनुत्तरित प्रश्नांवर अधिक नेमकेपणाने प्रकाश टाकण्यात आला आहे.