"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञता
schedule04 Aug 26 person by visibility 158 categoryसामाजिक
कोल्हापूर: शिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांच्या निधनामुळे शिवाजी विद्यापीठ परिवारालाही मोठा धक्का बसला. ‘दादा’ या नावाने सुप्रसिद्ध असणाऱ्या डॉ. पाटील यांच्या अनेक स्मृतींना या निमित्ताने उजाळा देण्यात येत होता.
शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभांसह विविध कार्यक्रमांना शक्य असेल त्यावेळी डॉ. डी.वाय. पाटील हे आवर्जून उपस्थित राहात असत. इथल्या अधिकारी, कर्मचारी यांच्याशीही त्यांचे आपुलकीचे नाते निर्माण झाले होते. विद्यापीठ परिवारातील घटकांना ते आपलेच वाटत असत. दादांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारीही आवर्जून भेटीसाठी जात असत. इतका स्नेहभाव दादांनी अखेरच्या क्षणापर्यंत जपला.
शिवाजी विद्यापीठाने जानेवारी २०१५ मध्ये झालेल्या ५१ व्या दीक्षान्त समारंभामध्ये शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी.वाय पाटील यांना डी.लिट. ही विद्यापीठाची सर्वोच्च पदवी देऊन गौरविले होते. या दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर होते. तत्कालीन कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांच्या हस्ते डॉ. पाटील यांना डी.लिट. पदवी प्रदान करण्यात आली होती.
यावेळी डॉ. डी.वाय. पाटील यांनी, मला आतापर्यंत अनेक विद्यापीठांनी डी. लिट. दिली. राज्यपाल असताना मी अनेकांना डी. लिट. प्रदान केली; परंतु आज माझ्या जन्मभूमी व कर्मभूमीतील विद्यापीठाने माझा सन्मान केला, ही बाब माझ्यासाठी महत्त्वाची आहे. त्याबद्दल मी शिवाजी विद्यापीठाचा कृतज्ञ असल्याची भावना डॉ. डी. वाय. पाटील व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे, शिवाजी विद्यापीठाकडून दर्जेदार विद्यार्थी घडविला जात आहे. त्याचा फायदा विधायक समाजनिर्मितीसाठी होत आहे. मानवाच्या जीवनात ज्यावेळी अहंकाराचा मृत्यू होतो, त्यावेळी त्याचे खरे जीवन सुरू होते. ध्येय निश्चित असल्यास यश मिळते. ज्ञानासाठी धडपड करावी. ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी पुस्तके वाचावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले होते.
दि. १३ एप्रिल २०२२ रोजी पद्मश्री डी.वाय. पाटील यांना शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि तत्कालीन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, तत्कालीन प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, शांतादेवी डी. पाटील आणि प्राचार्य डॉ. बाबासाहेब खोत मंचावर उपस्थित होते.
यावेळी डॉ. डी.वाय. पाटील यांनी म्हटले होते की, प्राचार्य कणबरकर सर हे माझे गुरू आहेत. गुरूंच्या नावे असणारा पुरस्कार मला मिळाला, यामुळे उपकृततेची भावना मनी दाटली आहे. त्यामुळेच अन्य पुरस्कारांपेक्षा हा पुरस्कार माझ्यासाठी खूप वेगळा आणि जवळचा आहे. पूर्वी गुरूदक्षिणा दिली जायची, पण आज गुरूकडून शिष्याचा सन्मान झाला आहे, हे या पुरस्काराचे वेगळेपण आहे, अशी भावना व्यक्त केली होती.
तसेच, डॉ. डी.वाय. पाटील यांनी पुरस्काराच्या १ लाख ५१ हजार रुपयांच्या रकमेत आणखी १० लाख रुपयांची भर घालून तो निधी विद्यापीठाकडे सुपूर्द करण्याची घोषणा केली. या निधीमधून संतसाहित्याच्या क्षेत्रात प्रभावी काम करणाऱ्या व्यक्तींसाठी पुरस्कार योजना निर्माण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. डॉ. पाटील यांच्या हस्तेच सदर ११ लाख ५१ रुपये इतक्या निधीचा धनादेश कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. त्यामधून सदर पुरस्कार योजना डॉ. डी. वाय. पाटील यांच्याच नावे विद्यापीठाने कार्यान्वित केली आहे.