कोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!
schedule04 Aug 26 person by visibility 132 categoryराज्य
◼️भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे राज्यपाल महोदयांना निवेदन; क्रीडा पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी केली आग्रही मागणी
कोल्हापूर : कोल्हापूर ही केवळ ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा लाभलेली भूमी नसून, ती महाराष्ट्रातील एक अग्रगण्य क्रीडानगरी म्हणूनही ओळखली जाते. कुस्ती, नेमबाजी, जलतरण, अॅथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, क्रिकेट आणि इतर अनेक क्रीडा प्रकारांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारे अनेक खेळाडू देशाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या हस्ते कोल्हापूरमध्ये राज्यपाल क्रीडा महोत्सव आयोजित करावा आणि या संदर्भात राज्य शासनाला मार्गदर्शन करावे, अशी मागणी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांच्याकडे पत्राद्वारे केलीय.
कोल्हापूर ही क्रीडा नगरी आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये येथील खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवशाली कामगिरी केली आहे. त्यामुळे कोल्हापुरात राज्यपाल क्रीडा महोत्सवाचे आयोजन झाल्यास कोल्हापूरसह राज्यभरातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल, विविध क्रीडा प्रकारांना चालना मिळेल आणि ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रतिभावान खेळाडूंना स्वतःचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध होईल.
याचबरोबर, आपण महाराष्ट्र शासनास कोल्हापूरमधील क्रीडा पायाभूत सुविधांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन करावे, अशी मागणी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी राज्यपाल वर्मा यांच्याकडे केली आहे. कोल्हापुरात आधुनिक बहुउद्देशीय क्रीडा संकुले, आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रशिक्षण केंद्रे, अत्याधुनिक मैदाने, निवासी क्रीडा अकादमी, खेळाडूंसाठी वैज्ञानिक प्रशिक्षण सुविधा आणि ग्रामीण भागातील क्रीडा सुविधा विकसित झाल्यास कोल्हापूर महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक आदर्श क्रीडा केंद्र म्हणून उदयास येऊ शकते. क्रीडा क्षेत्रातील गुंतवणूक ही केवळ पायाभूत सुविधांची उभारणी नसून, ती आपल्या युवकांच्या आरोग्यदायी, शिस्तबद्ध आणि राष्ट्रानिमानी भविष्याची गुंतवणूक आहे.
आपल्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली हा उपक्रम निश्चितच राज्यातील युवा पिढीसाठी नवी ऊर्जा आणि दिशा देणारा ठरेल, असा विश्वास आहे. त्यामुळे राज्यपाल वर्मा यांनी या विनंतीचा सकारात्मक विचार करून कोल्हापूरला राज्यपाल क्रीडा महोत्सवाचे यजमानपद बहाल करावे तसेच कोल्हापूरच्या क्रीडा विकासासाठी आवश्यक पावले उचलण्यास शासनास प्रोत्साहित करावे, अशी विनंती पत्राद्वारे कृष्णराज महाडिक यांनी केली आहे.