शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
schedule09 Jun 26 person by visibility 430 categoryसामाजिक
कोल्हापूर : सुपीक जमिनी हिरावून घेणाऱ्या आणि कोल्हापूरच्या पर्यावरणाला धोकादायक ठरणाऱ्या प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'च्या विरोधात आज शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतकरी एकवटले. या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या महामोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
'विकासकामांच्या नावाखाली आम्हाला भूमिहीन करण्याचा डाव आम्ही हाणून पाडू', असा इशारा देत हजारो शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. 'एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द', 'मातीशी गद्दारी खपवून घेणार नाही' अशा घोषणांनी कोल्हापूरचा परिसर दुमदुमून गेला होता. सव्वा दोन वर्षांपासून सुरू असलेला हा लढा आता अधिक तीव्र झाला असून, सरकारने बळजबरी केल्यास तीव्र संघर्ष करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
आमदार सतेज पाटील यांनी या प्रकल्पावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "हा महामार्ग म्हणजे केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट आहे. १२ नद्यांचे पात्र ओलांडून जाणारा हा रस्ता कोल्हापुरात महापुराचा धोका निर्माण करेल. सरकार या प्रकल्पावर लाखो कोटी खर्च करण्याऐवजी किल्ल्यांचे संवर्धन आणि बेरोजगार तरुणांना दरमहा मानधन देण्यासारख्या जनहितकारी कामांवर भर द्यावा." ते म्हणाले की, हा रस्ता अनेक गावे आणि मंदिरांचे नुकसान करणारा आहे. भाजपचे हिंदुत्व आता कुठे गेले आहे? दीड-दोनशे मंदिरांना फटका बसणार असताना सरकार गप्प का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, सरकारचा हा मनमानी कारभार कोल्हापूरची जनता कदापि सहन करणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध केला. "आम्ही तीन वर्षे संयमाने लढा दिला, मात्र आता वेळ आक्रमक होण्याची आहे. मोजणीसाठी येणाऱ्या यंत्रणेला आता आम्ही धडा शिकवू," असे त्यांनी जाहीर केले. तसेच, स्थानिक लोकप्रतिनिधींनी आता तरी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे, अन्यथा २०२९ च्या निवडणुकीत जनता त्यांना जाब विचारेल, असा इशाराही त्यांनी दिला.
माजी मंत्री जयंत पाटील यांनीही सोलापूरच्या एका मंत्र्यांच्या हट्टापायी पंढरपूरला आराखड्यातून वगळल्याचा आरोप करत शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या सरकारवर निशाणा साधला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या या विराट मोर्चाने महायुती सरकारची कोंडी केली असून, आता सरकार या प्रकल्पाबाबत काय ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी, महिला सहभागी झाल्या होत्या.