इंधन साठा मुबलक; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचे देशभरात 'धाडसत्र'
schedule04 Apr 26 person by visibility 122 categoryदेश
दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती पाहता, केंद्र सरकारने देशातील इंधन आणि ऊर्जा सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. विविध मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर, देशात एलपीजी (LPG), पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही देण्यात आली असून नागरिकांना कोणताही तुटवडा भासू नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
एलपीजी वितरण अधिक सुलभ करण्यासाठी सरकारने ५ किलोचे एफटीएल (Free Trade LPG) सिलेंडर सर्व वितरण केंद्रांवर उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे, या सिलेंडरसाठी कोणत्याही निवासी पुराव्याची (Address Proof) गरज नसून केवळ ओळखपत्र दाखवून ते मिळवता येईल.
काल एकाच दिवसात देशभरात ७१ हजार एफटीएल सिलेंडरची विक्री झाली आहे. तसेच, गॅस आरक्षणासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त डिजिटल माध्यमांचा वापर करावा, असे आवाहनही मंत्रालयाने केले आहे.
देशातील शेती क्षेत्राला खतांचा तुटवडा भासू नये यासाठी सरकारने खत निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना होणारा वायू पुरवठा ९० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. यामुळे खतांचे उत्पादन विनाखंड सुरू राहून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
इंधनाची साठेबाजी आणि काळा बाजार करणाऱ्यांविरोधात सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सर्व राज्यांमध्ये प्रशासनाकडून तपासणी मोहीम राबवली जात असून, काल एका दिवसात देशभरात ३,७०० ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत.
नैसर्गिक वायूच्या वापराला गती देण्यासाठी सरकार पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) जोडणीवर भर देत आहे. मार्च महिन्यापासून आतापर्यंत देशभरात सुमारे साडेतीन लाख नवीन पीएनजी जोडण्यांना वायू पुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.