कोल्हापुरात २ ऑगस्ट रोजी पहिले ‘अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन’; डॉ. श्रीपाल सबनीस अध्यक्ष, तर शाहिर दिलीप सावंत असणार उद्घाटक!
schedule28 Jul 26 person by visibility 174 categoryसामाजिक
कोल्हापूर : सत्यशोधक इतिहास परिषदेच्या वतीने पहिल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन रविवारी, दि. २ ऑगस्ट २०१६ रोजी सकाळी १०.३० वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, विचार आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा व्यापक विचार मांडण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस असणार आहेत. सुप्रसिद्ध शाहिर दिलीप सावंत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून स्वागताध्यक्ष म्हणून साहित्यिक व विचारवंत डॉ. डी. वाय. जमादार उपस्थित राहतील. तसेच कवी, प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने कवी संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत.
◼️संमेलनातील मुख्य कार्यक्रम व परिसंवाद:
* महत्त्वाचा विषय: संमेलनात अण्णाभाऊंच्या साहित्यातील जातिंताचा विचार या महत्त्वपूर्ण विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
* परिसंवाद अध्यक्ष: डॉ. आलोक जत्राटकर.
* प्रमुख वक्ते: डॉ. वैशाली चौगुले आणि राहुल सदोलीकर हे वक्ते अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील सामाजिक समता, जातिअंत, परिवर्तनवादी विचार आणि समकालीन संदर्भ या विषयांवर आपले विचार मांडणार आहेत.
जीवन गौरव पुरस्कार प्रदान:
चार सत्रात होणाऱ्या या संमेलनात डॉ. भारत पाटणकर आणि प्रा. किसनराव कुराडे यांना 'लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि परिवर्तनवादी वारशाचा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे प्रसार व्हावा, त्यांच्या विचारांवर व्यापक चर्चा घडावी आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना बळ मिळावे या उद्देशाने हे पहिले साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सत्यशोधक इतिहास परिषदेच्या वतीने सांगण्यात आली आहे.
या संमेलनासाठी साहित्यप्रेमी, अभ्यासक, संशोधक, कवी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक डॉ. कपिल राजहंस व साहित्यिक व विचारवंत डॉ. डी. वाय. जमादार यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. पत्रकार परिषदेला डॉ. डी. वाय. जमादार, डॉ. कपिल राजहंस, मदत पवार, डॉ. वसंत भागवत, अंतिमा कोल्हापूरकर, शंकर पुजारी व सुनील जाधव उपस्थित होते.