बोगस जात दाखल्यांविरोधात कोल्हापुरात ९ मार्चला 'संघर्ष महामोर्चा'; अनुसूचित जातीच्या हक्कांवर गदा आणणाऱ्यांना दणका देण्याचा निर्धार!
schedule04 Mar 26 person by visibility 249 categoryसामाजिक
कोल्हापूर: अनुसूचित जातीच्या (SC) आरक्षित जागांवर खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे डल्ला मारणाऱ्या प्रवृत्तींविरोधात आणि त्यांना साथ देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात कोल्हापुरात रणशिंग फुंकण्यात आले आहे. 'अनुसूचित जाती आरक्षण बचाव जनआंदोलन समिती'च्या वतीने येत्या सोमवार, ९ मार्च २०२६ रोजी कोल्हापूर शहरात एक भव्य 'संघर्ष महामोर्चा' आयोजित करण्यात आला आहे.
▪️संवैधानिक आरक्षणाचा गैरवापर
पत्रकार परिषदेत माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उत्तमदादा कांबळे, राजीव आवळे आणि नगरसेवक दुर्वास बापू कदम यांनी खळबळजनक आरोप केले. समितीच्या दाव्यानुसार, पट्टणकोडोली जिल्हा परिषद सदस्य दरगोंडा बसगोंडा पाटील (महेश पाटील), गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश महादेव तुरबतमठ आणि इचलकरंजीच्या नगरसेविका सौ. अलका अशोक स्वामी यांनी अनुसूचित जातीची (लिंगडेर/इतर) खोटी प्रमाणपत्रे सादर करून निवडणुका लढवल्या आहेत. हा केवळ कायद्याचा भंग नसून खऱ्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांच्या राजकीय संधीवर आणलेली गदा आहे.
भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निशाणा
समितीने केवळ लोकप्रतिनिधींवरच नाही, तर त्यांना खोटे दाखले देणाऱ्या आणि छाननी प्रक्रियेत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही तोफ डागली आहे. यात प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे (इचलकरंजी), अप्पर तहसीलदार महेश खिलारे, कार्यकारी दंडाधिकारी ऋषिकेत शेळके, आणि उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप करत, त्यांची खातेनिहाय चौकशी आणि बेनामी संपत्तीची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
◼️समितीच्या प्रमुख मागण्या:
* संबधित लोकप्रतिनिधींची जात प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करून त्यांची पदे बरखास्त करावीत.
* खोटी प्रमाणपत्रे सादर करणाऱ्यांवर तात्काळ कठोर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
* संबधित महसूल अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी.
* भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी जात पडताळणी प्रक्रिया अधिक कडक व पारदर्शक करावी.
जिल्ह्यातील समाजबांधवांना आवाहन
हा लढा केवळ एका जागेसाठी नसून संपूर्ण अनुसूचित जातीच्या अस्तित्वाचा आणि घटनात्मक हक्काचा आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बौद्ध, मातंग, चर्मकार, खाटीक, वाल्मिकी, बुरुड आदी प्रवर्गातील समाजबांधवांनी, महिलांनी आणि तरुणांनी ९ मार्च रोजी होणाऱ्या या महामोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. मागणी पूर्ण न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
या पत्रकार परिषदेला उत्तमदादा कांबळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार राजीव आवळे, नगरसेवक दुर्वास बापू कदम, पॅंथर शिवाजीराव कवाळे, डी.जी. भास्कर, सुभाष देसाई, प्रेमानंद मौर्य, डॉ. शरद गायकवाड, डॉ. अनिल माने, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, दीपक खांडेकर ,श्रीकांत मोरे, प्रमोद कदम, राजेंद्र ठीकपुर्लीकर, बाळासाहेब भोसले, पांडुरंग कांबळे,भाऊसो काळे, दत्ता मिसाळ, जयसिंग पाडळीकर, बाळासाहेब वाशीकर, प्रदीप मस्के,अशोक घाडगे,हरी कांबळे,सुभाष कांबळे, संदीप हेर्लेकर, प्रज्योत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. वैभव प्रधान यांनी आभार मानले.