कोल्हापूरच्या 'माधुरी बेकरी' ने जपलाय ऐतिहासिक वारसा...!
schedule09 Aug 25 person by visibility 668 categoryसामाजिक

▪️स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शेकडो किलो जिलेबी, गुलाबजामची होते विक्री
कोल्हापूर शहराला एक ऐतिहासिक व सांस्कृतिक क्षेत्रात वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी चित्र, नाट्य, शिल्प साहित्य, कला, क्रीडा व औद्योगिक क्षेत्रातील गुणीजनांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन व प्रेरणा दिली. याच करवीर नगरीतील मध्यवर्ती बिंदू चौकाला ऐतिहासिक महत्त्व आहे. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे उगमस्थान म्हणून बिंदू चौक स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुप्रसिद्ध आहे, याच बिंदू चौकात स्वातंत्र्य सैनिक अनंतराव वडगांवकर यांनी माधुरी बेकरी या बेकरी व कन्फेक्शनरी व्यवसायाची छोट्या प्रमाणात सुमारे ५८ वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवली, आज या लावलेल्या इवल्याशा रोपट्याचा मोठा वटवृक्ष झाला आहे.
आज 'माधुरी बेकरी' हे नांव घेतले की, कोल्हापूर जिल्ह्यातील सामान्य ग्राहकांपासून ते उच्चभ्रूंपर्यंतच्या ग्राहकांच्या जिभेवर रूचकर व स्वादिष्ट बेकरी, कन्फेक्शनरी व फरसाण प्राॅडक्टची चव आपसूकच रेंगाळत राहते.
उंची दर्जा, सचोटी, माफक दर व ग्राहकांभिमूख सौजन्यपूर्ण सेवा या गुणांमुळे हीरक महोत्सवाकडे यशस्वी वाटचाल करणारी माधुरी बेकरी आज कोल्हापुर जिल्ह्यात नावलौकिक मिळवून राहिली आहे. "माधुरी बेकरी"चे वडगांवकर बंधूंची कोल्हापूरकरांशी एक वेगळीच नाळ जुळलेली आहे. विविध प्रकारचे पेस्ट्री केक, बर्थडे केक,मिठाईचे पदार्थ व बेकरी पदार्थ तसेच स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रूचकर व स्वादीष्ट जिलेबी गुलाबजाम म्हैसूर पाक तसेच दिवाळी सणानिमित्त संपूर्ण फराळाचे जिन्नस यांना घरगुती चव व स्वाद देऊन ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. माधुरी बेकरीतील प्रत्येक उत्पादीत मालाची क्वालिटी (दर्जा) राखण्यासाठी वडगांवकर बंधू कमालीचे दक्ष असतात. वरकी, कांडी बटर यासारखे जुन्या कोल्हापूरकरांना आवडणारे पदार्थ ही तितक्याच आपुलकीने ग्राहकांना विनम्र भावनेने पुरवणारे वडगावकर बंधू ग्राहकांना आपलेच वाटतात. माधुरी बेकरीतील खाद्यपदार्थ विक्री करीत असताना वडगावकर बंधू ते ग्राहकांपर्यंत सुरक्षित पोहोचविण्यासाठी फारच सावधगिरी व काळजी घेतांना दिसतात. मिठाईच्या छोट्या डब्यावर येथील अंबाबाई मंदिराशी मिळती जुळती विशिष्ट कलाकृती दर्शनी भागावर आहे. शिवाय विशिष्ट अशा बिस्किटांची विक्री करीत असताना त्या कागदी वेस्टनाच्या आतील बाजूस करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर ,ऐतिहासिक जुना राजवाडा, पर्यटकांची रम्य सायंकाळ कायमची मनात ठेवून जाणारा रंकाळा तलाव,न्यू पॅलेस या वास्तूंच्या कलाकृती ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. अर्थात करवीरनगरीचा वास्तुरूप ऐतिहासिक वारसा सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या माधुरी बेकरी च्या वडगांवकर कुटुंबीयांचे कार्य कौतुकास्पद आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातही देश स्वातंत्र्यासाठी हिरीरीने भाग घेणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक अनंतराव वडगावकर यांचा वारसा जपत वडगांवकर बंधूंनी सातत्याने सामाजिक बांधिलकी व सद्भावना जपली आहे. आपल्या जन्मभूमीचे, कर्मभूमीचे आपण देणे लागतो या प्रामाणिक भावनेतून व्यवसाय करीत असताना आपल्या शहराची ओळख सर्वदूर पोहोचावी हाच संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. त्यांचा नेहमीच सामाजिक व धार्मिक उपक्रमात सदैव सहभाग असतो, हे विशेष आहे.
✍️ डाॅ. सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर