शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात 'आजी-माजी विद्यार्थी-पालक मेळावा' उत्साहात
schedule26 Mar 26 person by visibility 83 categoryशैक्षणिक
◼️विविध कलाविष्कारांनी रंगली 'आजी-माजी विद्यार्थी-पालक' स्नेहसंमेलनाची मैफल
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ येथील संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने बुधवार, दिनांक २५ मार्च २०२६ रोजी 'आजी-माजी विद्यार्थी आणि पालक मेळाव्या'चे आयोजन करण्यात आले होते. अधिविभागाच्या मुख्य ऑडिटोरियममध्ये सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि कलात्मक वातावरणात पार पडला.
या मेळाव्याचे मुख्य आकर्षण विद्यार्थ्यांचे वैविध्यपूर्ण कलाविष्कार ठरले. भरतनाट्यमच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सुंदर नृत्यविष्काराने कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात झाली. अधिविभागातील चित्रकलेच्या विद्यार्थ्यांनी काढलेली सुरेख व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे आणि रेखाचित्रे आणि रांगोळी यांची प्रात्यक्षिके लक्षवेधी ठरली. हार्मोनियमच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सामूहिक वादन कौतुकास पात्र ठरले.
नाट्यशास्त्र सर्टिफिकेट आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी 'विंडो सीट' ही लघुनाटिका सादर केली. तसेच, सद्यस्थितीतील 'वृक्षतोड' या ज्वलंत विषयावर आधारित 'घुसखोर' या मूकनाट्याने उपस्थितांना अंतर्मुख केले. विजया पाटील आणि आर्या मोहिरे यांनी 'संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाची माहिती व वाटचाल' या विषयावर सादर केलेले संवादरुपी 'प्रहसन' अत्यंत लक्षवेधी आणि माहितीपूर्ण ठरले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे प्र. विभागप्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणातून विभागाची प्रगती आणि भविष्यातील ध्येयांवर प्रकाश टाकला. प्रसिद्ध कवि व अधिविभागाचे विद्यार्थी डॉ.चंद्रकांत पोतदार यांनी आपल्या भाषणामध्ये कलेचे महत्व अधोरेखित केले. यावेळी माजी विद्यार्थी व पालकांनीही मनोगत व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अतुल परीट यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विकास कांबळे, राज पाटील, अमित साळोखे, पद्मश्री बागडेकर, संदेश गावंदे आणि ओंकार सूर्यवंशी, बबन माने व विजय उपाध्ये यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची ध्वनिव्यवस्था विक्रम परीट व डॉ. संजय तोडकर यांनी सांभाळली, तर तांत्रिक बाजूची धुरा मल्हार जोशी यांनी यशस्वीपणे पेलली.
या मेळाव्यासाठी विद्यापीठातील आजी-माजी विद्यार्थी, पालक, अधिविभागातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यामुळे अधिविभागाशी असलेले ऋणानुबंध व आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला.