शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पन्न वाढवा, सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्या, कृषी विज्ञान केंद्रांशी सतत संपर्क ठेवा; खा. धनंजय महाडिक यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद
schedule01 Jun 25 person by visibility 392 categoryराज्य

कोल्हापूर : कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली आणि व्हनाळी येथे 01 जून रोजी विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, नैसर्गिक शेती, मृदा आरोग्य आणि पशुपालन यासंबंधी माहिती देण्यात आली. या अभियानाचा कालावधी २९ मे ते १२ जून २०२५ असा असून, देशभरातील ७०० जिल्ह्यांमध्ये १.५ कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे.
सिद्धनेर्ली (कागल तालुका) येथे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून आधुनिक शेती तंत्रज्ञान, ऊस शेतीतील नविन पद्धती, खरीप हंगामातील पीक व्यवस्थापन आणि पशुपालनाच्या नवीन तंत्रज्ञनाचा वापर करण्याचे आवाहन केले. त्यांनी शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्रांशी संपर्क ठेवण्याचे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
▪️ऊस शेती आणि खरीप हंगामातील पीक व्यवस्थापन
ऊस शेतीतील नवीन तंत्रज्ञान, सुधारित बियाणे आणि सिंचन पद्धतींचा अवलंब करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी मिश्र पीक पद्धती, मृदा आरोग्य तपासणी आणि नैसर्गिक शेतीच्या पद्धतींचा अवलंब करण्याचे शेतकऱ्यांना सुचविले.
▪️पशुपालन आणि दुग्धव्यवसायातील संधी
पशुपालन क्षेत्रात, केंद्र सरकारच्या 'शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादन' योजनेअंतर्गत, पशु आरोग्य व्यवस्थापन, दुग्ध उत्पादन वाढ आणि पशु पोषण यावर भर देण्यात आला आहे. या योजनेतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा उद्देश आहे.
▪️नवीन योजनांची माहिती
शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती एकत्रितपणे मिळवण्यासाठी विविध 'ॲप' आणि संकेतस्थळ विकसित केलेले आहे. या 'एक खिडकी योजने' च्या माध्यमातून, शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि लाभ मिळवणे सुलभ होईल.
याशिवाय, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सात नवीन योजना जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये 'डिजिटल कृषी मिशन', 'पशुधन आरोग्य आणि उत्पादन', 'फलोत्पादनाचा शाश्वत विकास' आणि 'कृषी विज्ञान केंद्रांचे बळकटीकरण' यांचा समावेश आहे.
धनंजय महाडिक यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, "शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पन्न वाढवा, सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्या आणि कृषी विज्ञान केंद्रांशी सतत संपर्क ठेवा."
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय,भारत सरकार व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून विकसित कृषी संकल्प अभियान (खरीपपूर्व कृषी रथयात्रा) यांच्या संयुक्त विद्यमाने २९ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत संपूर्ण देशभरात विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत खरीप पूर्व राष्ट्रीय प्रचार मोहीम राबवली जाणार आहे. कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मार्फत प्रचार रथाव्दारे थेट शेतकऱ्यांना खरीप हंगामावरील तांत्रिक माहिती दिली जाणार आहे. हे अभियान शेतीची उत्पादन क्षमता व उत्पन्नवाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, कणेरी, कोल्हापूर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
या अभियानाचा उद्देश मागणीवर आधारित कृषी संशोधनाला चालना देणे, शेतीमधील नवोन्मेष, संशोधन व तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे,आणि शाश्वत व सर्वसमावेशक कृषी विकासासाठी शेतकरी केंद्रित उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा आहे. जिल्ह्यातील या अभियानाची अंमलबजावणी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर यांच्या नेतृत्वाखाली केली जात आहे. यामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभाग, (आत्मा), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, तसेच आयसीएआर अंतर्गत विविध संस्थांचे बहुमूल्य सहकार्य लाभत आहे.
या अभियानांतर्गत शेतकरी संवाद रथ हे माध्यम वापरण्यात आले. या कार्यक्रमात भाकृअनुप-पुष्प कृषि अनुसंधान निदेशालय, पुणेचे डॉ. प्रशांत व डॉ. राहुल यांनी शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. रवींद्र सिंह, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, श्री सिध्दगिरी कृषि विज्ञान केंद्र, कणेरी यांनी कार्यक्रमाचा प्रास्ताविक केले आणि शेतकऱ्यानं जास्ती जास्त या अभियानामध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावे असे आवाहन केले. डॉ. विद्या सागर गेडम, ऊस व गुळ संशोधन केंद्र, कोल्हापूर यांनी ऊस पिकावर सखोल मार्गदर्शन केले. सौ. रक्षा शिंदे, प्रकल्प संचालक, आत्मा, कोल्हापूर यांनी शेतकरी आयडी, एकात्मिक माती व्यवस्थापनामध्ये माती आरोग्य पत्रिका, नवीन शासकीय योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमात शेतकरी कंपनीचे सदस्य, नवाचार करून चांगले शेती व शेती निगडित व्यवसाय करणारे शेतकरी व महिला उद्योजक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी केव्हिकेचे सर्व शास्त्रज्ञ, कृषि विभाचे अधिकारी व कर्मचारी, आत्मा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.