कोल्हापुरात शिक्षकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
schedule09 Jul 26 person by visibility 157 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज कोल्हापुरातील हजारो शिक्षकांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध नोंदवला. शिक्षक संघटनांनी दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या या भव्य मोर्चात शिक्षण क्षेत्रातील समस्यांचा पाढा वाचण्यात आला.
या मोर्चात प्रामुख्याने सेवा अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांची ‘टीईटी’ (TET) सक्ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली. २०१० चा कायदा आताच्या शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याला शिक्षकांनी कडाडून विरोध दर्शवला. २५-३० वर्षे सेवा देणाऱ्या अनुभवी शिक्षकांनी आता पुन्हा टीईटी परीक्षा देणे कितपत योग्य आहे, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. याव्यतिरिक्त, शालेय कामकाजाचा वाढता बोजा, 'एसआयआर' (SIR) पोर्टलवरील कामांचा ताण आणि विविध ऑनलाइन प्रक्रियांच्या जाचातून शिक्षकांना मुक्त करण्याची मागणी करण्यात आली.
शिक्षक संघटनांनी ठाम भूमिका घेतली असून, शिक्षकांना शाळाबाह्य कामे (उदा. बीएलओ, एसआयआर) दिली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचे म्हटले आहे. अशा कामांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, ही कामे तातडीने बंद करावीत आणि त्याऐवजी शिक्षण घेणाऱ्या तरुणांना ही जबाबदारी सोपवावी, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.
या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील साधारणपणे १,००० शाळा बंद राहिल्या असून, सुमारे ८,००० शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. शिक्षण हे केवळ हक्क नसून, ते देणे हे शासनाचे कर्तव्य आहे आणि आमची मागणी पूर्ण होईपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.