सुधारित आकृतीबंध आणि फेरीवाला समितीच्या मुद्द्यावरून काँग्रेस-शिवसेना (उबाठा) आक्रमक; आजपासून महापालिकेसमोर लाक्षणिक साखळी उपोषण!
schedule12 Mar 26 person by visibility 135 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रलंबित 'आकृतीबंध' मंजूर करावा आणि 'शहर पथविक्रेता समिती' तातडीने अधिसूचित करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आज, गुरुवार १२ मार्च २०२६ पासून महाविकास आघाडीच्या वतीने लाक्षणिक साखळी उपोषण पुकारण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर आणि काँग्रेस गटनेते इंद्रजित बोंद्रे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले असून, राज्य सरकारला यापूर्वीच पत्राद्वारे निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता.
राजेश लाटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुधारित आकृतीबंधासह सेवाप्रवेश नियमांना गेल्या दोन वर्षांपासून नगरविकास विभागाकडून मंजुरी मिळालेली नाही. राज्यातील इतर महापालिकांच्या नियमांना मंजुरी मिळाली असताना कोल्हापूरलाच का डावलले जात आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आकृतीबंधाअभावी मनपातील भरती आणि पदोन्नती प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली असून, अपुऱ्या मनुष्यबळामुळे दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होत आहे.
दुसरीकडे, २०२४ मध्ये स्थापन झालेली २० सदस्यांची 'शहर पथविक्रेता समिती' (फेरीवाला समिती) अद्याप अधिसूचित करण्यात आलेली नाही. यामुळे शहरात फेरीवाला धोरण निश्चित करता येत नसून, अनियंत्रित अतिक्रमणांमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. निवडून आलेल्या सदस्यांच्या तक्रारींकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
व्यापक जनहित आणि मनपाच्या बळकटीकरणासाठी हे दोन्ही प्रश्न ४८ तासांत निकाली काढावेत, अशी विनंती 'मविआ'ने केली होती. मात्र, प्रशासनाकडून ठोस हालचाली न झाल्याने अखेर आजपासून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हे साखळी उपोषण सुरू करण्यात येत आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे. या आंदोलनात शिवसेनेचे विजय देवणे, दुर्वास कदम, भारती पवार, तसेच काँग्रेसचे नगरसेवक नगरसेविकास सहभागी झाल्या होत्या.