१५५ वर्षांची गौरवशाली परंपरा: मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ चा वर्धापन दिन उत्साहात संपन्न!
schedule22 Aug 26 person by visibility 184 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : ऐतिहासिक आणि गौरवशाली परंपरा लाभलेल्या मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक ११, कसबा बावडा, कोल्हापूर याचा १५५ वा वर्धापन दिन आज अत्यंत उत्साहात, आनंदात आणि अभिमानास्पद वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या दैदिप्यमान यशाने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण केले होते.
या वर्धापन दिन सोहळ्यात शाळेचा विद्यार्थी प्रणित प्रशांत पाटील याने इयत्ता पाचवीच्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत नववा क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये शाळेच्या तब्बल १४ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवून दिलेला हा विक्रम संपूर्ण बावडा परिसरासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवासाठी काढण्यात आलेली खुली जीप रॅली गुणवंत विद्यार्थ्यांचा सहभाग विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केंद्र शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान अद्ययावत ठेवण्याचे, चांगल्या सवयी जोपासण्याचे आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगण्याचे आवाहन केले. प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती शीला सोनुले यांनी महापालिका शाळांचा पट वाढवण्यासाठी हे यश अत्यंत प्रेरणादायी असल्याचे नमूद केले आणि शाळेला हवी ती मदत देण्याचे आश्वासन दिले.
तसेच, उपसभापती पूजा पोवार यांनी शुभेच्छा दिल्या. भागाचे नगरसेवक सचिन चौगले यांनी शाळेच्या शेजारील डॉ. डी. वाई. पाटील बालवाडीची अतिशय दिमाखदार सुसज्ज इमारत (ज्युनिअर केजी, सिनियर केजी व ग्रंथालय) लवकरच सीएसआर फंडातून उभारली जाणार असल्याची माहिती दिली. यासाठी आमदार सतेज पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक विनायक कारंडे यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाला नवा विक्रम असे संबोधले.
प्रशासनाधिकारी जयश्री जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शालेय पोषण आहाराची पाहणी केली आणि आवश्यक सूचना केल्या. शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, समावेशित शिक्षण समन्वयक राजेंद्र आपुगडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक डॉ. अजितकुमार पाटील यांनी, सूत्रसंचालन आर. जी. कीर्तिकर यांनी तर आभारप्रदर्शन उत्तम कुंभार यांनी केले. शेवटी गुणवंत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. १५५ वर्षांच्या या समृद्ध वाटचालीने शाळेच्या इतिहासात यशाचे आणखी एक सोनेरी पान जोडले गेले आहे.