सिक्कीम येथे भुस्खलनामुळे अडकलेल्या राज्यातील प्रवाशांचा पुढील प्रवास सुखरूपणे सुरू
schedule02 Jun 25 person by visibility 186 categoryराज्य

मुंबई : अतिवृष्टी आणि तिष्टा नदीला पूर आल्याने सिक्कीम लॅचुंग येथे भुस्खलनाची घटना घडली. या ठिकाणी महाराष्ट्रातील ४० पर्यटक अडकले होते. या घटनेसंदर्भात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सिक्कीम येथील आपत्कालीन कार्य केंद्राशी तात्काळ संपर्क साधण्यात आला. या संदर्भात सिक्कीम प्रशासन यांनी सूचना/ अॅडवायजरी निर्गमित केल्या आहेत. याविषयी महाराष्ट्र सदन येथील निवासी आयुक्त यांनी सिक्कीम प्रशासनाशी संपर्क साधला. सद्य:स्थितीत पाऊस थांबला असल्याने नॉर्थ सिक्कीम ते गंगटोक रस्ता चालू झाला आहे. रस्ता सुरू झाल्याने अडकलेल्या प्रवाशांचा पुढील प्रवास सुरू झाला असल्याची माहिती राज्य आपत्कानील कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.
▪️राज्यात काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६.६ मिमी पावसाची नोंद
दिनांक १ जून पासून ते २ जून सकाळपर्यंत राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६.६ मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात ११.४ मिमी, मुंबई उपनगर ८.० मिमी, कोल्हापूर ७.९ मिमी, रायगड ४.४ मिमी इतकी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
दिनांक १ जून रोजी सोलापूर व नाशिक जिल्ह्यात विहिरीत पडणे या घटनेमुळे प्रत्येकी एक व्यक्ती मृत झाली असून ठाणे जिल्ह्यात आगीच्या घटनेत तीन व्यक्ती जखमी झाल्या असल्याची माहिती राज्य आपत्कानील कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.