काळम्मावाडीतील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन
schedule15 Jun 26 person by visibility 117 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : अलनिनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबल्याने काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी लक्षणीयरीत्या घटली असून काळम्मावाडी धरणातून थेट पाइपलाईन योजनेचा पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेकडून काळम्मावाडी धरणक्षेत्रातील इन्टेकवेल व जॅकवेल परिसरात साचलेला गाळ काढण्याचे काम दोन एक्स्कॅव्हेटर मशिनद्वारे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
काळम्मावाडी योजनेतून पाणी उपसा बंद झाल्यामुळे शहराला पर्यायी शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र पंचगंगा नदीची पाणीपातळीही कमी झाल्याने शिंगणापूर येथून मर्यादित स्वरूपातच पाणी उपसा करता येत आहे. जल संपदा विभागाशी महानगरपालिकेने समन्वय साधून राधानगरी धरणातून पंचगंगा नदीमध्ये पाणी सोडण्याचे नियोजन केलेले आहे. मंगळवार दि. १६ जून २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंत शिंगणापूर बंधारा पूर्ण क्षमतेने भरून घेण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यानंतर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
पावसाळा पूर्णपणे सुरू होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरेसा राहावा यासाठी नागरिकांनी पाण्याचा अत्यंत जपून व काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळून महानगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.