आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पाठपुराव्याला यश ; शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील लोडशेडिंग बंद
schedule20 Jul 26 person by visibility 266 categoryसामाजिक
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भाग, विशेषतः मळा भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून सिंगल फेज वीजपुरवठ्यामुळे चार ते पाच तासांच्या लोडशेडिंगचा सामना करावा लागत होता. या समस्येमुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत होत होते. या गंभीर प्रश्नाची दखल घेत आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महावितरणकडे पाठपुरावा करून अखेर ग्रामीण भागातील लोडशेडिंग बंद करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे मळा भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिरोळ तालुक्यातील अनेक गावांतील मळा भागात राहणाऱ्या नागरिकांना रोजच्या रोज चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. रात्रीच्या वेळी अंधारामुळे महिलांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत होता. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत होता, तर शेतकऱ्यांची शेतीशी निगडित अनेक कामे खोळंबत होती. तसेच अंधारामुळे सरपटणाऱ्या प्राण्यापासून धोका निर्माण होत होता.
ही समस्या आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे ग्रामीण व मळा भागातील ग्रामस्थांनी मांडल्यानंतर आमदार यड्रावकर यांनी महावितरणला संपर्क साधत लोडशेडिंग बंद करण्याची मागणी लावून धरली होती. त्यामुळे मळा भागातील नागरिकांना लोडशेडिंगच्या त्रासातून मुक्ती मिळणार आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अखंड वीज उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांची शेतीची कामे अधिक सुलभ होणार आहेत. ग्रामीण भागातील लहान-मोठे उद्योग, दुकाने आणि व्यावसायिकांनाही याचा मोठा लाभ मिळणार आहे. तसेच घरगुती कामे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि दैनंदिन जीवन अधिक सुरळीत होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करत आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आभार मानले आहेत.
ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या या पाठपुराव्यामुळे शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.