औद्योगिक समस्या सोडविण्याची कौशल्ये आत्मसात करा : जिया झंवर
schedule01 Mar 26 person by visibility 226 categoryशैक्षणिक
🔸️डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट मध्ये ‘टेक्नॉलॉजिया’ संपन्न
कोल्हापूर: विद्यार्थ्यांनी औद्योगिक समस्या सोडविण्याची कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. टेक्नॉलॉजिया सारख्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये प्रदर्शित करण्याची उत्तम संधी प्राप्त होते, असे प्रतिपादन झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालिका जिया झंवर यानी केले. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन टेक फेस्ट ‘टेक्नोलोजिया २०२६’ मध्ये प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.
या महोत्सवाच्या सांगता समारंभात झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालिका जिया झंवर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील होते. त्यापूर्वी कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, रजिस्ट्रार डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील , डॉ. इंटरडिसिप्लिनरी संशोधन केंद्राचे अधिष्ठाता सी. डी. लोखंडे, संशोधन संचालक डॉ. पी. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगावी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधून सुमारे ८७२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना तब्बल १ लाख रुपयांच्या बक्षिसांसह राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
स्पर्धांमध्ये रोबो रेस, कोड शफल अश्या स्पर्धांमधून तांत्रिक कौशल्य, तार्किक विचारसरणी आणि गेमिंग क्षमता अधोरेखित झाली. शार्क टँक, डिबेट, रील बॅटल व अॅड-मॅड स्पर्धांमधून सर्जनशीलता, सादरीकरण कौशल्य आणि व्यावसायिक दृष्टीकोन दिसून आला. आयपीएल ऑक्शन व मिनी प्रोजेक्ट सादरीकरणातून व्यवस्थापन कौशल्य व नवकल्पना साकारल्या, तर स्क्विड गेममध्ये संघभावना व चपळाईची कसोटी लागली. विविध आणि आकर्षक स्पर्धांमुळे तांत्रिक ज्ञानासोबतच नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि व्यवस्थापन कौशल्यांचा संगम अनुभवायला मिळाला.
प्रा. अश्विन देसाई, प्रा. अनिकेत परदेशी, प्रा अभिजीत मटकर व डॉ. दीपक पाटील, विद्यार्थी समन्वयक रितेश कोल्हे आणि आर्या उलपे यांनी यशस्वी नियोजन केले. यावेळी विविध संस्था व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्रमुख, पदाधिकारी, विभागप्रमुख, समन्वयक, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.