काळाची क्रूर थट्टा! देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांची गाडी विहिरीत; ९ जणांचा दुर्दैवी अंत
schedule14 Jun 26 person by visibility 138 categoryगुन्हे
सोलापूर : देवदर्शन करून आनंदाने घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील भाविक म्हसवड येथील सिद्धनाथांचे दर्शन घेऊन पिकअप वाहनाने आपल्या गावी परतत होते. रविवारी सायंकाळच्या सुमारास हे वाहन म्हसवड-तांदुळवाडी रस्त्यावरून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. परिणामी, ही गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने बचाव कार्यामध्ये अडथळे येत होते, तरीही युद्धपातळीवर प्रयत्न करून ९ भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या अपघातात काही जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाकडून या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू असून, या घटनेमुळे रांजणी गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.